नवी दिल्ली : अयोध्या मुद्द्यावरील सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालाशी संबंधित सर्व विषय पाहण्यासाठी अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांचा विभाग स्थापन करण्यात आला आहे. याचे नेतृत्व अतिरिक्त सचिव ग्यानेश कुमार यांच्याकडे असेल असे गृहमंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आयोध्या मंदिर उभारणीच्या कामाला त्यामुळे सरकारने वेग दिल्याचे मानले जात आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या खंडपीठाने वादग्रस्त जागेवर राममंदीर उभारण्याचा निर्णय नऊ नोव्हेंबर रोजी दिला होता. तर मस्जीद उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर क्षेत्राचा भूखंड देण्याचा आदेश देण्यात आला. गृहमंत्रालयाचा हा नवा विभाग कुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व विषय हाताळेल.
आयोध्येत पाच एकरच्या तीन भूखंडापैकी एक भूखंड बोर्डाला देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारने पाठवला आहे. या सर्व बाबी आता कुमार यांच्या नेतृत्वाखालील विभाग पाहील. कुमार यांच्याकडे जम्मू आणि काश्मिर, लडाख यांच्याशी संबंधित विभागही आहे.