जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या प्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातच यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संपूर्ण घटनेवर भाष्य करत सरकारला दोषी ठरवले आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेस आजपासून जनसंवाद यात्रा काढणार असल्याची माहिती दिली.
नाना पटोले म्हणाले की, “देशात हुकुमशाही प्रवृत्ती तयारी झाली आहे, या हुकुमशाहीच्या भयापासून जनतेला मुक्त करण्यासाठी, त्यांना हिंमत देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. लोकशाही वाचली पाहिजे, सगळ्या जातीधर्माचे लोक सुखाने राहिले पाहिजे यासाठी व्यवस्था निर्माण करणं काँग्रेसचं काम आहे. यासाठी आजपासून आम्ही यात्रेला निघालो आहोत. यात्रा आष्टी पासून सुरू होईल आणि ही यात्रा आज २२ किलोमीटर चालेल. दररोज सकाळी सात वाजता ही यात्रा सुरू होईल.”
पुढे ते म्हणाले, “जनसंवाद यात्रा झाल्यानंतर जालन्याला जाणार आहे. खोटारड्या भाजपने विशेष करून २०१४ मधील फडणवीस सरकारने खोटं आश्वासन देऊन सत्तेत आले. धनगर, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आलं होतं. मोदी सरकारला कोणाचंही भलं करायचं नाही, आरक्षण संपवायचं आहे. नवीन पर्याय काढला जातोय ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं, म्हणजे महाराष्ट्रत ओबीसी-मराठा युद्ध निर्माण करायचं पाप हे करत आहेत. यामुळे आपआपसात समाजात भांडण निर्माण करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न हे करत आहेत. यांच्या खोट्या मानसिकतेत कोणी फसू नका तुम्हाला न्याय काँग्रेसच देऊ शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच जालन्यातील या घटनेप्रकरणी पोलीस अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबतही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात पोलीस अधिक्षकांचा दोष काय? सरकारने सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, तर सरकारच दोषी आहे. सरकारच्या आदेशाचं पोलिसांनी पालन केलं. त्यामुळे पोलीस विभाग दोषी नाही, सरकार दोषी आहे. सरकारवरच कारवाई व्हावी, सरकारने पायउतार व्हावं अन्यथा जनता त्यांना खाली ओढेल,” असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.