नवी दिल्ली: देशातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास हादरला आहे. मात्र तरीही मोदी सरकार वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार नाही, अशा शब्दात कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांनी आज सरकारवर टीका केली.
मोदी देशाच्या आर्थिक स्थिती सुधारतील या आशेवर गेल्या सहा वर्षांत भारताच्या शेअर बाजारामध्ये 45 अब्ज डॉलर ओतले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी जूनपासून 4.5 अब्ज डॉलर किंमतीच्या भारतीय शेअरची विक्री केली आहे, या आशयाच्या वृत्ताचा हवालाही प्रियांका गांधींनी दिला.
दररोज 5 ट्रिलियन, 5 ट्रिलियन असे म्हणून किंवा माध्यमांमधील मथळे बनवून् अर्थव्यवस्था सुधारली जाऊ शकत नाही. परदेशातील कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणूकदार येत नाहीत, असे म्हणून पंतप्रधान मोदींच्या ह्युस्टनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबत प्रियांका गांधी यांनी टीका केली. महासत्ता होण्याच्या वाटेत ही आर्थिक मंदी “स्पीड ब्रेकर’ आहे. या परिस्थितीत सुधारणा न करता, इतर सर्व बडबड निरुपयोगी आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.