सरपंच, ग्रामसेवकांना गटविकास अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीसा
नीरा -गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीत दि. 26 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेच्या वादाच्या प्रकरणात नवीन सत्य समोर आले आहे. या सभेचे गौडबंगाल उघड झाले असून मागील सभा तहकूब करताना लिहिण्यात आलेल्या तारखेत खाडाखोड करण्यात आली आहे. तसेच नवीन सभेचा अजेंडा काढण्यात आला नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांना गटविकास अधिकारी मिलिंद मोहिते यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
गुळुंचे ग्रामपंचायत मनमानी कारभार करत असल्याबाबत तसेच बेकायदा ठराव मंजूर करीत असल्याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आमचा गाव आमचा विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी घेण्यात आलेली ग्रामसभा नियमबाह्य असल्याने ती रद्द करण्याची निगडे यांनी यावेळी केली होती. तर ग्रामसभा नियमाप्रमाणे घेतल्याचा दावा सरपंच संभाजी कुंभार व ग्रामसेवक जयेंद्र सूळ यांनी केला होता. त्याप्रमाणे विस्तार अधिकारी कुंभार यांनी चौकशी केल्यानंतर ग्रामसभा नियमात झाली नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, शासकीय नियमाप्रमाणे 26 जानेवारी 2020 रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. परंतु, तत्पूर्वी झालेल्या सभेचा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने मागील सभेचे इतिवृत्त कायम कसे होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने या महिन्यात अतिक्रमण यादीत खाडाखोड केली असून त्यामधील परिशिष्ट क बदलण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीने संगणक प्रणालीत फेरफार केले असल्याचा आरोप निगडे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यासाठी तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तसेच आगामी दोन दिवसात फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे अक्षय निगडे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीने मनमानी कारभार केला आहे. या महिन्यात सरकारी दस्त ऐवजात फेरफार केले आहेत. या सर्वांवर निर्णय होणे आवश्यक आहे. गोरगरिबांना त्यांच्या न्याय हक्कांपासून डावलले जात असून मानवी हक्कांचा भंग होत आहे.
– अक्षय निगडे, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्ष.