पिंपरी (अमोल शित्रे ) – केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे महापालिकेने टोलेजंग गृहप्रकल्प बांधला आहे. या गृह संकुलातील १४ माळ्यांच्या ६ इमारतींमधील २८८ घरांचे वाटप केले आहे. हक्काचे घर मिळाल्याच्या आनंदात याठिकाणी सुमारे ६ हजार रहिवासी वास्तव्यास आले आहेत. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून याठिकाणी पाण्याची सोय नाही, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर लिफ्ट चालत नाही, उद्यान, ओपन जीम, मुलांची खेळणी नसल्यामुळे घर दिले, पण सुविधा कधी देणार असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकातील रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी आवास योजनेंतर्गत बो-हाडेवाडी येथे गृह प्रकल्प बांधला. त्यातील ए, बी, सी, डी, ई आणि एफ अशा १४ माळ्याच्या ६ इमारती बांधून त्यातील २८८ घरांचा लाभार्थ्यांना ताबा दिला आहे. काही इमारतींमधील घरांचा ताबा दिला असला तरी सुविधांअभावी त्याठिकाणी नागरिक राहण्यास आलेले नाहीत. सध्या येथे सुमारे ६ हजार नागरिक वास्तव्य करतात. परंतु, त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेली दोन महिने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांनी महापालिकेकडे पुरेसे पाणी देण्याची मागणी केली. त्याकडे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना संताप अनावर झाला असून त्यांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे.
या प्रकल्पाला १.५ इंचाचे नळजोड आहेत. त्याद्वारे पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसा पुरवठा केला जात नाही. किमान ४ इंचाची पाईपलाईन कनेक्शन असणे अपेक्षित आहे. ते नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना स्वखर्चातून टॅंकरद्वारे पाणी उपलब्ध करावे लागत आहे. सोसायटीच्या देखभालदुरुस्तीचे १ हजार आणि टॅंकर वेगळे पैसे खर्च करावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. याशिवाय, दररोज नागरिकांना अंघोळीचे गरम पाणी देण्यासाठी सौर उर्जेवर कार्यान्वीत होणारा सोलर पॅनल यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचेही तीन तेरा वाजले आहेत. कधी गरम पाणी येते तर कधी येत नाही, अशी परिस्थिती आहे.
सदनिका आणि समस्या
– प्रकल्पात ६ इमारती, १२८८ सदनिका
– दीड इंचाचे नळजोड
– टॅंकरद्वारे पाणी पुरवठा
– नागरिकांना भुर्दंड
– जनरेटर बंद
– सोलर यंत्रणा बंद
– लाईट गेल्यानंतर लिफ्ट बंद
– नागरिकांना १४ मजले जिने चढावे लागतात
– उद्यानातील लॉन ९० टक्के नष्ट
– बाकडे नाहीत
– लहान मुलांची खेळणी नाहीत
– ओपन जीम नाही
७८ हजार ७५१ हजार लिटर जलतूट
पाणी पुरवठा विभागाकडून दररोज प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी वितरण केले जाते. त्यानुसार एका घरात ४ लोक असतील, तर साधारणपणे एका घराला ५४० लिटर पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे एका इमारतीला १ लाख १६ हजार ६४० लिटर पाण्याची गरज आहे. दिवसाआड पाणी पुरवठा असल्याने त्यांना दुप्पट पाणी देणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या दोन दिवसांत ७० हजार लिटर पाणी दिले जाते. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवाशांवर अन्याय होत आहे. प्रतिदिन तब्बल ७८ हजार ७५१ लिटर पाण्याचा तुटवडा भासत आहे. ही गरज भागवण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी पैसे काढून पाण्याचे टॅंकर मागवावे लागत आहेत.
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नळ जोडणीचे रितसर अर्ज केलेले नाहीत. सोसायटीला एकच दीड इंचाचे नळजोड अधिकृत असल्याचे दिसून येत आहे. नळ जोडणीसाठी रितसर अर्ज करून त्यांची आवश्यक रक्कम कोषागारात भरावी. त्यानुसार सोसायटीच्या मानकांनुसार नळजोड लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
– रामनाथ टकले, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता