नेवासे -अपघात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या नावावर विमा न भरताही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम थेट खात्यावर जमा होते. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने विमा कार्यालय बंद आहे. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांची अर्ज भरण्यासाठी ससेहोलपट होऊ नये, म्हणून शासनाने जयका विमा सल्लागार कंपनीची नेमणूक केली असून, आता हे अर्ज या कंपनीकडून ऑनलाईन भरून घेण्यात येणार आहेत.
अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा, म्हणून राज्य सरकारने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. अपघात झाल्यास योजनेच्या निकषानुसार सरकारने नियुक्त केलेली विमा कंपनी दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसास नुकसान भरपाई देते. प्रचलित योजनेत शेतकऱ्याचे कुटुंब विमा छत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, योजनेचे व्यप्ती वाढवण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार शेतकऱ्यासह त्यांच्या कुटुंबातील नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठी देखील लाभ देण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कार्यालय बंद असल्याने अर्ज दाखल करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने जयका या विमा कंपनीची नेमणूक केली असून, ही कंपनी संबंधितांचे ऑनलाईन अर्ज भरून घेणार आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. त्यांचे अर्ज प्रलंबित राहू नयेत व तत्काळ विमा कंपनीला माहिती दिली जावी. त्यासाठी तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.
मनोज गवांदे, जिल्हा प्रतिनिधी, जयका विमा सल्लागार कंपनी