भाजपच्या महाजनादेश यात्रेवर वडेट्टीवारांचा प्रहार
मुंबई: भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे आव्हान देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेवर प्रहार केला.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या, 1 ऑगस्टपासून “महाजनादेश’ यात्रा सुरु होत आहे. या यात्रेवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजपने 2014च्या निवडणूक प्रचारात वारेमाप आश्वासने दिल्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून सत्ता दिली. परंतु पाच वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला. त्याचाच परिणाम म्हणून पाच वर्षात तब्बल 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जमाफीचा गवगवा केला, पण आजही 30 लाख शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करुन मालामाल झाल्या पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. पिकाला हमी भाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन फक्त आश्वासनच राहिले. खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वाटप 25 टक्केही झाले नसून सरकारी बॅंकांच्या उदासिन धोरणामुळे 75 टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. 2016च्या कर्जाचे पुनर्गठन करुनही बॅंका त्या कर्जावर 14 ते 16 टक्के व्याज आकारणी करुन शेतकऱ्यांना लुबाडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
पाच वर्षात राज्यात मोठ्या उद्योगाची उभारणी झालेली नाही. नागपूरच्या मिहानमध्ये सत्यम, विप्रो, एल अँड टी, व इतर आयटी कंपन्या आल्या पण रोजगार निर्मिती झाली नाही. पतंजली फूड पार्कसाठी 230 एकर जमीन देण्यात आली, पण प्रकल्प अद्याप उभा राहिला नसल्याने रोजगारही निर्माण झाला नाही. राज्यातील वाहन उद्योगालाही सरकारच्या धोरणांमुळे घरघर लागली आहे.
72 हजार जागांसाठीची मेगा भरती, 24 हजार शिक्षक भरतीच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात एकालाही नोकरी मिळालेली नाही. मुद्रा योजनेतून लाखो रोजगार निर्माण झाल्याचा सरकारचा दावाही फसवाच निघाला आहे. नोकरीची आशा लावून बसलेल्या बेरोजगारांच्या स्वप्नांची राखरांगोळी सरकारने केली, त्याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा, असे वडेट्टीवार म्हणाले.
पाच वर्ष निराशा आणि फसवणूक केलेले लोक पुन्हा फसव्या घोषणा करण्यासाठी रथयात्रा काढत आहेत, पण राज्यातील जनता यांच्या भूलथापांना यावेळी बळी पडणार नाही, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
भ्रष्टाचारात बुडालेले सरकार
महाराष्ट्रातील सत्तेवरील युतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. समृद्धी महामार्ग घोटाळा, चिक्की घोटाळा, एसआरए घोटाळा, आदिवासी विभागातील घोटाळा, जलयुक्त शिवार योजनेसह अनेक घोटाळे झाले पण कसलीही चौकशी न करता मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीनचिट देऊन टाकली. त्या भ्रष्ट मंत्र्यांचा हिशोब जनतेला द्यावा. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाच वर्ष टोलवाटोलवी केली आणि निवडणुकीच्या तोंडावर अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घोषीत करुन या समाजाची बोळवण केली, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.