-श्रीकांत येरूळे
आण्णा भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण झाले नसतानाही त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. ज्यामुळे ते आपल्या प्रतिभासंपन्न लेखनशैलीला न्याय देऊ शकले. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा सर्व साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेले आहे.
साहित्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे साहित्यिक म्हणजे तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ आण्णा भाऊ साठे. जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, प्रगतीपासून कोसो मैल दूर राहिलेल्या मातंग समाजामध्ये आण्णा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगारी जात म्हणून शिक्का मारला असल्याकारणाने जन्मल्यापासून जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.
एक ख्यातनाम मराठी साहित्यिक अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला असली तरी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या भूमिकांना तितक्याच दर्जेदारपणे न्याय दिला आहे. तमाशाला लोकनाट्याची खऱ्याअर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णा भाऊ साठेंना दिले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणीशी आपली नाळ जोडली आणि समतेच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आपल्या कार्याची सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांना अभिवादन म्हणून आण्णा भाऊ साठे यांनी “जग बदल घालुनी घाव, सांगूनि गेले मज भीमराव’ हे एक गीत लिहिले होते. आज हे गीत सगळ्यांसाठी प्रेरणागीत म्हणून प्रसिद्ध आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आण्णा भाऊ साठे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लोकशाहीर अमर शेख यांच्या साथीने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकजागृतीचे कार्य त्यांनी केले. 1944 मध्ये त्यांनी “लाल बावटा’ हे पथक स्थापन केले होते. पुढे मुंबई सरकारने “लाल बावटा’ या कलापथकावर बंदी घातली होती. मात्र, सरकारने कितीही विरोध केला तरी त्यांनी आपले काम सातत्यपूर्ण चालू ठेवले.
मानवी जीवनातील वास्तव, संघर्ष, अडचणी, दुःख, दारिद्य्र या सगळ्या पैलूंचे त्यांच्या साहित्यातून प्रकटीकरण झालेले आहे.त्यांच्या साहित्याचे परकीय भाषांत भाषांतरे झालेली आहेत. ज्यामध्ये इंग्रजीसह रशियन, झेक, पोलीश, फ्रेंच आदी परकीय भाषांचा समावेश आहे. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी, चिरानगरची भूतं, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. त्यांनी तीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी. फकिरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता या त्यातील काही महत्त्वपूर्ण कादंबऱ्या आहेत. फकिरा या त्यांच्या कादंबरीला 1961 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या “फकिरा’ या कादंबरीत भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून सामान्यांना वाटप करणाऱ्या फकिरा या मातंग समाजातील साहसी तरुणाचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमध्ये “माझी मैना गावावर राहिली’ आणि “मुंबईची लावणी’ या लोकप्रिय आणि अर्थपूर्ण कलाकृती आहेत.
समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आण्णा भाऊ साठेंनी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले. आपले साहित्य आणि चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दलित, कष्टकरी, सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्यात संघर्ष आणि विद्रोहाचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन असंख्य लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झालेली आहे. आजही त्यांना प्रेरणास्थानी ठेवून असंख्य लेखक समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या आपल्या लेखणीतून मांडत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्तीसंग्राम या चळवळींसाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे. भारताला स्वातंत्र्य तर मिळाले मात्र, विशिष्ट वर्गातील लोकांचे शासन त्यांना मान्य नव्हते.म्हणून त्यांनी “ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है’ म्हणत हजारो लोकांच्या सहकार्याने मुंबई येथे मोर्चा काढला.
पहिल्या दलित साहित्य संमेलनात ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे या शब्दांत लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी कामगारांचा सन्मान केला आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कष्टकरी समाजाच्या व्यथांना आवाज फोडण्याचे काम केले आहे.
सांगली जिल्ह्यातील छोट्याशा वाटेगावपासून मुंबई मार्गे रशियापर्यंत झालेला त्यांचा प्रवास संघर्षशील तर होताच मात्र, यामध्ये हजारो वर्षांपासून अत्याचार आणि जुलूम करणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेला प्रतिउत्तर देणाराही होता. मिळेल ते काम करीत, विज्ञानवादाची कास धरीत, वास्तव जीवनातील अनुभवांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाट करून देणारे आण्णा भाऊ साठे हे स्वकर्तृत्वाने घडले. त्यांचे घडणे हे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला नवसंजीवनी देणारे होते. अशा या साहित्यसम्राट महामानवाचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले.
आण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याकारणाने त्यांच्या कार्याचा सम्यकपणे आढावा घेणे गरजेचे आहे. त्यांचे कार्य आणि साहित्य येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या विचारांचा जागर करीत, त्यांच्या कार्यापासून आदर्श घेत समाजातील विषमता, दु:ख, दारिद्य्र नष्ट करण्यासाठी आपण कार्य करणे हेच त्यांना खऱ्याअर्थाने अभिवादन ठरेल. समतेवर आधारित समाजनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.