पुणे – ”दादा, शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं, पण आता त्यांचे (अजित पवार) कार्यकर्तेही ऐकत नाही हे माहिती झालं. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे.” अशा शब्दात भाजप खासदार गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत कोरोनाच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केलं होतं. याप्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. यावरून बापट यांनी राष्ट्रवादीला लक्ष केले आहे.
राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. असेही गिरीश बापट म्हणाले
ईडीच्या चौकशीमागे भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जात असल्याच्या आरोपासंदर्भात बोलताना बापट म्हणाले की, ”कोणतीही कारवाई भाजप करत नाही. तपास यंत्रणा त्या कारवाई करत असतात.” असे सांगून गिरीश बापट यांनी हे आरोप नाकारले. तसेच,”भाजप गरीब पार्टी आहे, ती कारवाई नाही तर, लोकांना मदत करणारी पार्टी आहे.” असे स्पष्टीकरणही बापट यांनी दिले आहे.
प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देताना गिरिश बापट म्हणाले, ” भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया देते आहे. भविष्यात काळात अशा गोष्टी होऊ शकतात. अनैसर्गिक लोकांमूळे आमची तुटली होती, भविष्यात युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद होईल. नाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचाय.”