नवी दिल्ली – देशात करोना महासाथ आल्यापासूनच अवघ्या देशवासीयांचे लक्ष प्रतिबंधात्मक लसीकडे लागून राहिलंय. अशातच आज केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देत मोठा दिलासा दिला.
मात्र लस लवकरच मिळेल आणि करोनाचे हे शुक्लकाष्ठ आपल्यामागून कायमचे सुटेल असा विचार आपण केला असेल तर जरा थांबा. कारण करोना लसीबाबत ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी केलेलं वक्तव्य लस वापरास मिळालेल्या परवानगीमुळे तुम्हाला झालेला आनंद क्षणिक ठरवू शकतं.
याबाबत बोलताना ICMR प्रमुख बलराम भार्गव यांनी, “करोना लसीची परिणामकारकता पुढे किती दिवस टिकेल याबाबत आपल्याला अद्यापतरी कोणतीच माहिती नाही. विषाणूची साखळी तोडण्यासाठी किती लोकसंख्येचे लसीकरण करणे गरजेचं आहे याबाबतही कोणता अंदाज नाही. या घडीला आपल्याला केवळ करोना महासाथीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी यासंबंधातील सुरक्षिततेचे उपाय परिणामकारक ठरतात एवढाच माहिती आहे.” असं स्पष्ट केलं.
लसीनंतर मास्क सुटणार?
दरम्यान करोना लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता मास्कपासून आपली सुटका होणार काय? असा प्रश्न नव्याने चर्चिला जात आहे. याबाबत बोलताना भार्गव यांनी, “माझ्या अंदाजानुसार मास्क हे सर्वात शेवटी जातील. किंवा त्यांचा वापर आता कधीच सुटणार नाही अशीही शक्यता नाकारता येत नाही.” असं वक्तव्य केलं.