एक मुलगी तावातावानं बोलत होती, “अंकल, मी त्यांच्याकडे गेलेली त्याच्या वेळेला’. मग काही वेळानं ती सांगू लागली, “अहो, असं काय करताय, मी गेलीवती ना त्याच्या वेळेला.’ मी तिला म्हटलं, “अग, तू चुकीचे शब्द बोलतेयस.’ तेवढ्यात तिचा फोन वाजला. त्यासरशी ती म्हणाली, “एक मिंटं हं.’ नंतर फोनवरचं बोलणं संपल्यावर “काय चुकीचं बोलली मी?’ मी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हटलं, “जवळ जवळ सगळंच चुकीचं बोललीस तू!’ “काय काय चुकीचं झालेलं ते सांगा ना?’
मी कपाळावर हात मारून घेतला पण एकनाथी संयमानं तिला सांगायचा प्रयत्न केला, “त्यांच्याकडे गेलेली नाही म्हणायचं तर त्यांच्याकडे गेले होते; त्याच्या वेळेला नाही तर तेव्हा म्हणायचं; गेलीवती काय? गेले होते असं म्हणायचं; एक मिंटं हे चुकीचं आहे, तर एक मिनिट असं म्हणायला पाहिजे. चुकीचं बोलली न म्हणता चुकीचं बोलले आणि चुकीचं झालेलं नाही म्हणायचं तर काय चूक झाली किंवा खरं तर काय चुका झाल्या असं म्हणायला हवं होतंस तू!’
तिचं तोंड मधूनमधून मोबाइलकडे असल्यानं तिनं माझं म्हणणं नीट ऐकून घेतलं की नाही याबद्दल मला शंकाच होती. शेवटी ती म्हणाली, “हुं, आम्ही सगळे असंच बोलतोय्. तुमचं सांगून झालं असलं तर मी जाईल.’ तेव्हा कळून चुकलं की, आपण सांगतोय तेच चुकतंय.
चुका समजावून सांगताना नेहमी पुढे येणारा प्रतिवाद म्हणजे “तुम्ही सांगता ते बरोबर कशावरून?’ आणि शब्दकोशाचा संदर्भ दिला तर प्रश्न उद्भवतो तो प्रमाण भाषेचा. प्रमाण भाषेला धुडकावून लावणाऱ्यांना मला असं सांगावंसं वाटतं की त्यांनी बाजारातून वजनावर काही पदार्थ घेतला तर प्रमाण नसलेल्या वजनाइतका पदार्थ त्यांना मान्य होईल का? प्रमाण हे व्यवहारामध्ये अतिशय आवश्यक आहे- मग ते वजन, लांबी असो किंवा भाषाही असो. सध्या चुकीचे शब्द फक्त बोलण्याचंच नव्हे तर लिहिण्याचं आणि मुद्रण होण्याचं किंवा प्रसिद्धी पावण्याचं पेवच फुटलंय की काय असं वाटायला लागलंय. पदोपदी चुकीच्या शब्दांचा वापर होताना मराठी भाषा जगवायची कशी, अशा चिंतेत पडलेल्या विद्वानांचं इकडे लक्ष आहे की नाही, असा संभ्रम पडतो. भाषा जगवायची कशी, या विवंचनेत असताना आपणच आपल्या भाषेचा संहार करतोय.
याची सुरुवात विशेष नामांपासून होताना दिसते. रिचा, क्रिती अशी सर्रास लिहिली जाणारी नावं पाहून ऋचा, कृती अशी नावं लिहिण्याची “कृती’ तरी त्या व्यक्तींना जमेल का, अशी शंका मनात येते. निरर्थक नावांबद्दल तर बोलायलाच नको. मध्यंतरी एकानं मुलाचं नाव “शर्विल’ ठेवल्याचं सांगितलं. त्याला या नावाचा अर्थ माहीत आहे का, असं विचारल्यावर त्यानं “नाही’ असं सांगितलं. मग मीच त्याला सांगितलं की, असा शब्द मराठी किंवा संस्कृतमध्ये नाही. याच्या सर्वात जवळचा शब्द “शर्विलक’ असून ते मृच्छकटिक नाटकातील एका चोराचं नाव आहे आणि त्यामुळे चोराला “शर्विलक’ म्हणण्याचा प्रघात आहे! हे ऐकून तो सर्दच झाला. “क्रिश’ हे नाव ऐकून तर मला हा काय प्रकार आहे तेच कळेना. तसंच काही जण “उज्वला’ असं नाव लिहितात- योग्य शब्द उज्ज्वला असा आहे.
वाचताना आणि ऐकताना असे चुकीचे शब्द समोर आले की, वापरणाऱ्याचा अभ्यास किती कच्चा आहे ते लक्षात येतं. असे काही शब्द म्हणजे: मतितार्थ (बरोबर शब्द- मथितार्थ. मथ् या संस्कृत धातूचा अर्थ ढवळणे असा आहे. मथित म्हणजे ढवळून काढलेला असा अर्थ); पौरुषत्व (बरोबर शब्द- पौरुष किंवा पुरुषत्व); मुखस्तंभ (बरोबर शब्द- मूकस्तंभ = खांबाप्रमाणे मुका असलेला); पारंपारिक (बरोबर शब्द- पारंपरिक); अल्पोपहार (बरोबर शब्द- अल्पोपाहार. उपहार म्हणजे भेट वस्तू आणि उपाहार म्हणजे खाणं); स्त्राव (बरोबर शब्द- स्राव. मूळ संस्कृत धातू “सृ’ म्हणजे वाहणे यापासून हे नाम तयार झालेलं आहे) तसंच स्रोत हा शब्द खूपसे लोक स्त्रोत असा लिहीत असल्यानं त्यांचं स्तोत्र का लिहू नये असा विचार मनात येतो.
रिक्षा किंवा ट्रकच्या मागे “आर्शिवाद’ असा शब्द रंगवला असेल तर आश्चर्य वाटायला नको. रंगवणाऱ्या व्यक्तीला शुद्धलेखनाची उपरती होवो असा “आशीर्वाद’ देण्याखेरीज आपल्या हातात काय आहे? नेहमी ऐकू येणारी अजून एक शब्दयोजना म्हणजे “त्यानं बासुंदी पिली’ यामध्ये पिणे या क्रियापदाचं रूप “पिली’ असं ऐकल्यावर मीच विष का नाही प्यालो, असं वाटू लागतं! भाषेवरचे हे वारंवार होणारे बलात्कार ऐकून आणि वाचून हा भाषेचा संहार कसा थोपवायचा, हे खरं आव्हान आहे.
श्रीनिवास शारंगपाणी