मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी चांगलाच गोंधळ सुरु आहे. निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवस झाले तरी आतापर्यंत राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले नाही. राज्यात मतदारांनी शिवसेना-भाजप महायुतीला कौल दिला आहे. मात्र या दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार या मंत्र्यांचा समावेश होता. या भेटी दरम्यान सत्ता स्थापनेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांच्या स्वहिताचा भांडणांमध्ये राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केले. कुंभकोणी राजभवनात दाखल झाले असून राज्यातील परिस्थितीबाबत नेमका काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.