मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगामुळे आज राजकीय घडामोडींनी वेग घेतला. सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार, असे बोलले जात असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांशी केवळ सत्तास्थापनेचा विलंब आणि त्यातील कायदेशीर तरतुदी यांबाबतच चर्चा केली. दरम्यान मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर त्यांना वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा येथे हलवले आहे. तेथे शिवसैनिकांचा पाहरा असून कर्नाटक प्रमाणे ऑपरेशन कमळ राबवू नये म्हणून ही उपाय योजना केल्याचे विश्वासनीय सुत्रांकडून समजते. दरम्यान शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असाल तर फोन करा अन्यथा फोन करू नका, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बजावले. तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपाचे सर्वच नेते (नितीन गडकरींसह) सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा गुंता वाढला असल्याचेच चित्र समोर येत आहे.
शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यात नेमक्या शब्दात ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेची युती करताना जे ठरले होते ते व्हों, बाकी काही अपेक्षा नाही. लोकसभेदरम्यान जे ठरले होते, ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो. जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये, उध्दव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटपाच्या मुद्यावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या बैठकीनंतर कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनच्या सर्व आमदारांना बैठकीनंतर वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे शिवसैनिकांनी खडा पाहरा ठेवला असल्याचे समजते. कर्नाटकात भाजपाने ऑपरेशन लोटस राबवले. त्यात जनता दल आणि कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याने भाजपावर विश्वास ठेवण्याच्या मन:स्थितीत शिवसेना नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच येत्या काही तासांत राजकीय समिकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.
राज्यपालांशी केवळ उशीराबाबत चर्चा : भाजपा
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अल्पमतातील सरकार स्थापण्यासाठी दावा करणार, असे पतंग मुंबईत उडवण्यात येऊ लागले. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली. मात्र तसा दावा केला नसल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. या शिष्टमंडळात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार या मंत्र्यांचा समावेश होता.
महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापन होण्यासाठी विलंब लागला आहे. याचसंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. आता पुढचं पुढे ठरवू असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
गडकरींची भूमिका आणि भावना
भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचेच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. जास्त जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
त्यापुर्वी राजधानी दिल्लीत गडकरी तातडीने सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटण्यासाठी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक पुड्या सोडण्यात आल्या. त्यात गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देऊन राज्यातील तिढ्यावर तोडगा काढण्यासा भागवत यांचा प्रयत्न आहे, अहमद पटेल यांनी गडकरी यांची भेट घेतल्याने राज्यातील समीकरणे बदलणार, त्यामुळे भागवत यांनी निमंत्रित केले अशा एक ना अनेक वावड्या उठल्या.
पाप आमचं नाही : राऊत
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असेल तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील. राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आज आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूक निकाल लागून दिवस उलटून गेले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. भाजपाला जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला जागा मिळाल्या आहेत. सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या दोन मागण्यांमुळे शिवसेना आणि भाजपात चर्चा थांबली आहे. आता ही कोंडी कशी फुटणार आणि सरकार कधी स्थापन होणार हे प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.