पुणे -रत्नागिरीप्रमाणेच स्थानिक गावरान हापूसला उष्णतेमुळे झालेली गळती, गाराच्या पाऊस अशा हवामान बदलाचा फटका बसला आहे. नेहमीच्या तुलनेत यंदा अवघे 10 टक्केच उत्पादन झाले आहे. आंब्याच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. आवकप्रमाणे मागणीही कमी आहे. तयार दर्जेदार मालाला डझनास 300 ते 400 रुपये भाव मिळत आहे.
कोकण, कर्नाटक हापूसनंतर गोड आणि नैसर्गिक पिकलेल्या गावरान हापूसची आवक कधी होते याची नागरिक वाट पाहत असतात. मात्र, गावरान हापूसकडूनही नागरिकांची यंदा निराशाच झाली आहे. 15 मे रोजी सुरू झालेला हंगाम जूनअखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असतो. यावेळी हंगाम बहरात येत असतो. दरवर्षी 250 ते 300 डाग तयार मालाचे बाजारात येत असतात. यंदा मात्र 15 ते 20 डागच आवक झाली आहे. एका डागामध्ये सुमारे 8 डझन आंबे असतात. मुळशी तालुक्यातील बेलावडे, उरावडेसह विविध भागातून आवक होत आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
गावरान हापूसची आवक अत्यल्प आहे. त्याला मागणीही कमीच आहे. केवळ दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत आहे. दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
– यशवंत कोंडे, गावरान हापूसचे व्यापारी
हवामान बदलाचा फटका गावरान हापूसला बसला आहे. उत्पादन नेहमीच्या तुलनेत खुपच कमी झाले आहे. त्याच्या फळांना मागणीही कमी आहे. आमच्याकडे हापूसची सुमारे 500 झाडे आहेत. मोठे नुकसान झाले आहे.
– केतन गुजर, शेतकरी, गुजरवाडी, ता. मुळशी