महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील थांबलेले क्रिकेट महाराष्ट्र प्रीमिअर लीग या एका स्पर्धेने पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होणार आहे. ही स्पर्धा पुण्यासह राज्यातील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने यंदाच्या मोसमापासून एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातच या लीगचाही समावेश करून राज्यातील होतकरू खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यातूनच पुण्यातील व राज्याच्या कानाकोपऱ्यातील गुणवत्तेला वाव तर मिळेलच परंतु ऋतुराज गायकवाड, केदार जाधव अशा दिग्गज खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभवही मिळेल व त्यातूनच महाराष्ट्राला व पर्यायाने देशाला एक भक्कम सेकंड बेंच मिळेल, असा विश्वास वाटतो.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने
आजवर महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये कधीही घडले नव्हते ते यंदा घडताना दिसणार आहे. संघटना एकाच मोसमात थोडेथोडके नव्हे तर तब्बल 557 सामन्यांचे आयोजन करणार आहे. येत्या 15 जूनपासून महाराष्ट्र प्रीमिअर लीग सुरू होत असून यात शेकडो खेळाडूंना सातत्याने सामने खेळण्याची तसेच आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मुख्यालय आहे. अध्यक्ष रोहित पवार यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. राज्यातील क्रिकेटच्या व पर्यायाने गुणवत्ता वाढीसाठी इतक्या संख्येने सामने होणे अत्यंत गरजेचे होते. शालेय, महाविद्यालयीन, क्लब स्तावरचे क्रिकेट पूर्वांपार पद्धतीने सुरूच होते. मात्र, इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर अशी स्पर्धा होणे सर्वात महत्त्वाचे व अभिमानास्पद आहे.
केवळ क्रीडानगरी असा उल्लेख करण्यापेक्षा असे नामी उपक्रम राबवले तर ते तळागाळातील गुणवत्तेला खरा न्याय देणारे ठरतील. रांचीसारख्या शहरातील छोट्या गावातून पुढे आलेला महेंद्रसिंह धोनी हे याचे उत्तम उदाहरण आहे. ज्या गावात क्रिकेटच्या पायाभूत सुविधाही नव्हत्या तेथून धोनी पुढे आला व जागतिक क्रिकेटमधे महान कर्णधार व खेळाडू बनला. असे अनेक चेहरे आहेत की ज्यांना अद्याप ओळख मिळालेली नाही ती या स्पर्धेद्वारे मिळावी. असे म्हणतात की ज्या देशाचे देशांतर्गत क्रिकेट अत्यंत स्पर्धात्मक असते तो देश जागतिक क्रिकेटवर राज्य गाजवतो. आधीचा काळ वेस्ट इंडीजचा होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने राज्य केले. आजचा काळ भारतीय संघाचा आहे. मात्र, हे चित्र कायम राहावे असे वाटत असेल, तर आपले देशांतर्गत क्रिकेट केवळ टिकलेच नाही तर अशा लीगच्या माध्यमांतून वाढलेही पाहिजे.
थेट प्रक्षेपणाचाही हातभार
या लीगचे प्रक्षेपण दूरदर्शनवर होणार असल्याने गावपाड्यातील मुलांनाही स्पर्धेतील सामन्यांचा अनुभव घेता येणार आहे. तसेच त्यात खेळणारे खेळाडू, त्यांची कर्तबगारी पाहता येणार आहे. कोण जाणे यातूनच देशाला शुभमन गिल, इशान किशन, यशस्वी जयस्वालसारखे युवा खेळाडू गवसतील. खरेतर आपल्याकडे मोठ्या वाहिन्या करोडोची किंमत मोजून आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतात. केवळ भारतीय संघाचेच सामने दूरदर्शनवर दाखवले जातात. रणजी करंडक किंवा तत्सम देशांतर्गत स्पर्धांची तर काय स्थिती आहे ते आपण पाहातच आहोत. निदान या लीगच्या माध्यमातून ही परिस्थिती बदलली तर देशांतर्गत क्रिकेटलाही सुगीने दिवस येतील.
संपूर्ण व्यावसायिकता यावी
आपण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देश पूर्ण व्यावसायिक वृत्तीने क्रिकेट खेळतात असे मानतो. मात्र, 2007 सालापासून भारतीय संघाकडेही एक संपूर्ण व्यावसायिक संघ म्हणूनच पाहिले जात आहे. हा चमत्कार काही एका दिवसात झालेला नाही. मुळात जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे जे यापूर्वी अन्य देशांकडे होते, ते आता आपल्याकडे आहे. अजूनही त्यात सुधारणेला वाव आहे. पण सुरुवात तर झाली आहे ही आनंदाची बाब निश्चितच आहे. तीच व्यावसायिकता महाराष्ट्र क्रिकेटमध्येही यावी यासाठी माजी क्रिकेटपटू अजिंक्य जोशी यांची संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या व्यक्तीकडे संघटनात्मक स्तरावर कसे काम चालते याचा अनुभव आहे आणि स्वतः खेळाडूच असल्याने खेळाडूंचे काय प्रश्न असतात व ते सोडवण्यासाठी कोणते मार्ग असतात हे अवगत आहे.
लिलावही अविश्वसनीय
या लीगचा लिलाव नुकताच पार पडला. त्यात नौशाद शेख सर्वात महागडा खेळाडू ठरला. तब्बल 6 लाख रुपयांची बोली लावून कोल्हापूर टक्सर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. नौशादने आतापर्यंत प्रथम दर्जाच्या अवघ्या 35 सामन्यांत 2 हजारांपेक्षा जास्त धावा करत आपले सातत्य सिद्ध केले आहे. 2016-17 सालच्या मोसमात त्याने महाराष्ट्रकडून रणजी पदार्पण केले. तो महाराष्ट्राचा कर्णधारही होता. महाराष्ट्राचा आणखी एक स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड पुणेरी बाप्पा संघाचा आयकॉन खेळाडू आहे. ऋतुराजने आयपीएल स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून देदीप्यमान कामगिरी केली आहे. या लिलावात भारतीय संघाचा स्टार खेळाडू केदार जाधवही कोल्हापूर टस्कर्सकडे आहे. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत तसेच आयपीएल स्पर्धा गाजवली त्यातील अनेक खेळाडू या लिलावात होते. राहुल त्रिपाठी, राजवर्धन हंगरगेकरसह जवळपास 300 खेळाडूंनी या लिलावासाठी उपस्थिती लावली होती. म्हणजेच आपल्याकडे किती खेळाडू आहेत पाहा. यातूनच उद्याच्या भविष्यातील संघ तयार होणार आहेत.
विमा संरक्षणही असावे
आयसीसीने नुकताच एक नियम केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना प्रत्येक फलंदाजाने हेल्मेट वापरलेच पाहिजे. याला कारण सुरक्षा हेच आहे. ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युज नावाचा एक फलंदाज हेल्मेटच्या मागील बाजूस अतिरिक्त आवरण नसल्याने चेंडू लागल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. तेव्हापासूनच आयसीसी या नियमावर चर्चा करत होती व अखेर त्याला मंजुरीही दिली गेली. तसेच संरक्षण किंवा विमा संरक्षण या लीगला दिले गेले तर ते खेळाडूंसाठी वरदान ठरेल. खेळ म्हटले की दुखापती आल्याच; पण असे कितीतरी खेळाडू आहेत की जे अत्यंत सामान्य कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत असतात. त्यांच्या खेळाचे पूर्ण साहित्य देखील नसते. तर ते सामने खेळताना होणाऱ्या किंवा होऊ शकतील अशा दुखापतींसाठी विमा कसा काढणार. त्यासाठी संघटनेने पुढार घेतला तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. असो, परंतु या लीगच्या माध्यमांतून इतक्या विषयांचा ऊहापोह केला गेला ती लीग निश्चितच यशस्वी ठरेल. या लीगद्वारे पुण्यासह राज्यातील युवा खेळाडूंना आपल्यातही स्पार्क आहे हे दाखवण्याची इतकी मोठी संधी मिळत आहे, हीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
सुविधा व मैदानांवर लक्ष द्यावे
पूर्वी पुण्यात जे सामने होत होते त्यातील बहुतांशी सामने विविध महाविद्यालयांच्या मैदानांवर होत होते. त्यातील अनेक मैदानांची अवस्था व त्याचे नियोजन याबाबत न बोललेलेच बरे. इथे नावही घेता आली असती परंतु कोणाचा पापड मोडू नये इतकेच. आतापर्यंत काय झाले ते मागे सोडून पुढे जाण्याची गरज आहे. शहरातील मध्यवर्ती मैदानांची स्थिती अत्यंत चांगली आहे, त्यामानाने काही महाविद्यालयांच्या मैदानांवर काम करण्याची गरज आहे. ऐन जून महिन्यात ही लीग सुरू होत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसांत सामने वाया जाऊ नयेत ही अपेक्षा आहे. पाऊस थांबल्यावर काही वेळात मैदान खेळण्यायोग्य बनवणे आता काळाची गरज आहे. खेळाडू, त्यांचे पालक, मित्रवर्ग तसेच हे सामने पाहण्यासाठी येणारे चाहते यांचा हिरमोड होऊ नये. कमी षटकांचे सामने मुळातच आता चाहत्यांच्या केंद्रस्थानी असतात, त्यामुळे पूर्वी कसोटी सामने पाहण्यासाठी दिसणारी गर्दी लीग क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेताना दिसते. त्यामुळे सुविधा, त्यांची निर्मिती, त्याचा सातत्याने केला जाणारा वापर व त्याचा मेंटेनन्स याकडे प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे. सुपर सॉपर मशिन्स, ते वापरू शकतील असे कुशल कर्मचारी ही देखील काळाची गरज आहे. त्याचबरोबर खेळाडू, पंच व सामन्यांशी संबंधित व्यक्तींसाठी स्वच्छ शौचायलांचीही उभारणी महत्त्वाची आहे. ड्रेसिंग रूम किंवा डगआउट हे अद्ययावत असणे गरजेचे आहे. प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार असेल तर पायऱ्याची रचना केली तर प्रत्येकाला अत्यंत व्यवस्थित सामने पाहता येतील उगीच एकमेक्यांच्या डोक्यावरून पाहण्याची गरज पडणार नाही.
अमित डोंगरे