कोल्हार, (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या कामाला नुकतीच परवानगी मिळाली असून सदर ठिकाणी असलेली जुनी इमारत पाडण्यात आली आहे. जुन्या काळातील असलेले हे बांधकाम पाडण्यात आल्याने येथून दगड, माती, चुनामिश्रित वाळू जेसीबीच्या साहाय्याने भरून याची विल्हेवाट ही जिल्हा परिषदेच्या शाळेत लावण्यात येत आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात उडालेला धुराळा शाळेतील चिमुकल्यांच्या नाकातोंडात जात असून, शाळा परिसरात लागलेले मोठमोठया दगडाचे ढीग अपघाताला आमंत्रण देत असल्यामुळे पालक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायत इमारतीचे गेल्या कामाचे उद्घाटन गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी करवून घेतले आणि आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तात्काळ काम सुरू देखील केले आहे, मात्र काम सुरु करण्यापूर्वी संबंधित जागेवर असलेली दगड, माती, चुना आणि वाळूच्या माध्यमातून बांधण्यात आलेली इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.
जेसीबी मशीनचा वापर करण्यात आल्यामुळे मोठमोठे धुळीचे लोळ पसरले आणि शेजारीच असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांच्या नाकातोंडांत जाऊ लागले. त्यामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे,
या ठिकाणाहून उचलण्यात आलेले दगड, माती, चुना, वाळू हे सर्व साहित्य जेसीबीच्या साहाय्याने उचलून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बिनबोभाट टाकण्यात आले. मोठमोठे दगड आणि लोखंडी गज या परिसरात अस्तव्यस्त पडलेले आहेत. केवळ ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर येथे साहित्य कण्यात आले आहे.
मात्र शाळेत शिकणारे चिमुकले नजरचुकीने या साहित्यावर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने चुकून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेत शिकणारे चिमुकले हे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या आरोग्यास अथवा अपघातास काही प्रसंग कारणीभूत ठरल्यास याची जबाबदारी कोण घेणार हा मूळ प्रश्न नागरिकांसह पालक वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे.
त्यामुळे एक प्रकारे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत पदाधिकारी, ठेकेदार आणि जिल्हा परिषद शाळा करत आहे. तात्काळ या परिसरात पडलेले हे साहित्य उचलण्यात यावे, अन्यथा चिमुकले शाळेत न पाठवण्याचा पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशारा पालक वर्गातून देण्यात आला.
शाळेच्या आवरात दगड मातीचे ढीग टाकत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळा किंवा ठेकेदार यांनी पालकांना विश्वासात घेतले नाही. सदर साहित्य टाकत असताना परिसरातील अनेक फळझाडे, फुलझाडे मोडली आहेत.
त्याचप्रमाणे या साहित्यामुळे आमच्या मुलांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला असल्यामुळे जोपर्यत हे साहित्य ठेकेदार उचलत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय लवकरात लवकर पालक सभा घेऊन घेण्यात येणार आहे. धनंजय शिरसाठ अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती