हिंजवडी, (वार्ताहर) – राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या परिसरात माण गवारेवाडी येथील क्रिस्टल मार्केट तसेच ओझरकरवाडी व गवारेमळा भागात काही अज्ञात लोकांकडून बेकायदेशीर कचरा, प्लास्टिक, केबल्स व अन्य राडारोडा पेटवून देण्याचे प्रकार घडत असून, त्याच्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पर्यायाने हवेत मिसळणार्या काळ्याकुट्ट धुरांच्या लोटाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने आशा समाजकंटक लोकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन सोसायटीधारकांनी माण ग्रामपंचायतीला दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एमआयडीसी व ग्रामपंचायत हद्दीच्या सीमेवर काही लोक जाणीवपूर्वक दररोज सकाळी आणि संध्याकाळी बेकायदेशीररित्या कचरा व अन्य प्लॅस्टिक सदृश्य वस्तू पेटवून देतात.
त्यातून निघणार्या विषारी धुरामुळे आजूबाजूला वास्तव्यास असणार्या गृहरचना संस्थांमधील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून, ज्येष्ठ नागरिक तथा लहान मुलांना श्वसनाचे आजार व शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत सोसायटीच्या काही रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील वारंवार याची माहिती दिली. परंतु त्यांच्याकडून अद्याप यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नाही.
परिसरात सतत पसरलेल्या धुरामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी देखील घराबाहेर निघता येत नाही. लहान मुलांना श्वसनाचे त्रास जाणवायला लागले आहेत. सतत जळत असलेल्या प्लॅस्टिक युक्त कचर्यामुळे नागरिकांना होणार्या त्रासापासून मुक्तता देण्यास मदत करावी.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने कारवाई मागणी
माण ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने या भागातील हवेची गुणवत्ता नियमित तपासून घ्यावी. तसेच परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या व्यावसायिक ठिकाणांना घनकचरा व्यवस्थापनाबद्दल ग्रामपंचायतीने तशा नोटिसा देऊन त्यांना याबाबतच्या सूचना कराव्यात, अशी मागणी सोसायटीतील रहिवासी व माणगाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष आनंद ओझरकर यांनी केली आहे.