पुणे {प्रभात वृत्तसेवा} : शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडे तब्बल १७ हजार कर्मचारी असतानाही शनिवार, रविवार, तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी शहरात कचर्याचे ढीग साचत आहे. महापालिकेत कायमस्वरूपी असलेल्या स्वच्छता सेवकांना शनिवार, रविवारसह शासकीय सुट्टीचाही लाभ असल्याने या दिवसांमध्ये शहरातील कचर्याची जबाबदारी ठेकेदारांच्या ४ हजार ८०० कर्मचार्यांवर असते. शिवाय साप्ताहीक सुट्टी, तसेच गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिक असल्याने जेमतेम साडेतीन हजार कर्मचारीच कचरा उचलण्याचे काम करतात. परिणामी शनिवार आणि रविवारी शहरात पुणेकरांना कचर्याचे ढीग पाहावे लागत असल्याचे चित्र आहे.
शहराच्या दैनंदिन स्वच्छ्तेसाठी महापालिकेचे सुमारे ९ हजार ८०० कर्मचारी आहेत, तर पालिकेच्या पाच परिमंडळांकडे सुमारे ४ हजार ८०० कर्मचारी आहेत. त्यांच्या सोबत घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी सुमारे साडेचार हजार कर्मचारी आहेत. मात्र, या कर्मचार्यांचे नियोजनच योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ केंद्र शासनाच्या पुरस्कारापुरते कागदावरच शहर स्वच्छ असून, शहरात जागोजागी कचर्याचे ढीग साचलेले दिसत आहेत.
शनिवार, रविवार वाढतोय कचरा
महापालिकेच्या कायम असलेल्या कर्मचार्यांना शनिवारी, तसेच रविवारी सुट्टी असते, तर जोडून सुट्टया आल्यास त्याचाही लाभ मिळतो. अनेकदा या जोडून येणार्या सुट्ट्या शुक्रवार किंवा सोमवारी असतात, त्याचा फटका शहराच्या कचरा उचलण्याच्या यंत्रणेवर होतो. शहरात दरदिवशी सुमारे २ हजार २०० टन कचरा उचलला जातो, तर महापालिकेकडून त्यातील केवळ दोन हजार टनांपर्यंतचा कचरा उचलला जातो.
शनिवार, रविवार सुट्टी असल्यास हे प्रमाण ८०० पर्यंत खाली येते. त्यामुळे दोन दिवस सुट्टी असल्यास जवळपास दीड हजार टन कचरा शहरात तसाच पडून असतो. सलग तीन दिवसांची सुट्टी असल्यास रोजच्या कचर्यासह अतिरिक्त २ हजार टन कचरा साठून असतो. तो उचण्यास पुढे बुधवारपर्यंतचा वेळ जातो. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते.
पेठांना सर्वाधिक फटका
शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या बाजारपेठ आहेत. शहरातील नागरिक, तसेच बाहेरगावातील नागरिकांकडून या दोन दिवसांत खरेदीसाठी गर्दी होते. परिणामी पेठांच्या भागात जादा कचरा निघतो. मात्र, सुट्टीमुळे तो उचलला जात नसल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या कचर्यातूनच वाट काढावी लागते.
कर्मचारी सुट्टीबाबत नियोजनाचे काम सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी पेठांमध्ये कचरा वाढतो. मात्र, कर्मचारी नसल्याने तो उचलला जात नाही. त्यामुळे याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल. – संदीप कदम ( उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग)