वडगाव हवेली -कराड तालुक्यावरील करोनाचे संकट गडद होत चालले आहे. आगामी गणेशोत्सवात “एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
या आवाहनाला दुशेरे ता. कराड गावाने पहिलाच प्रतिसाद देत एकजूठ दाखवली आहे. गणेशोत्सव एकत्र सोशल डिस्टन्सिंगने साजरा करून करोनाला हरवण्याचा निर्धार दुशेरेकरांनी केला आहे. दुशेरे गावाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी व ग्रामपंचायतीनी घ्यावा, असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक उदय दळवी यांनी केले आहे. कराड तालुक्यात सध्या करोनाचा प्रार्दुभाव धक्कादायकपणे वाढत आहे.
प्रार्दुभाव रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. यातच आगामी गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सर्वच गावांना “एक गाव एक गणपती’ उपक्रमाची हाक दिली आहे. या हाकेला पहिला प्रतिसाद देत दुशेरे गावाने सामाजिक बांधिलकी जपत करोना रोखण्यासाठी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. दुशेरे येथे हनुमान मंदिर पटांगणात सोशल डिस्टन्स ठेवत “एक गाव एक गणपती’ संदर्भात बैठक पार पडली.
बैठकीला उपनिरिक्षक उदय दळवी, पोलीस पाटील संदीप जाधव, गावातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व सभासद, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
उदय दळवी म्हणाले, करोनाची सद्यस्थिती पाहता गावातील सर्व मंडळांनी एकत्रित येऊन ग्रामदैवत हनुमान मंदिरात गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा करावी. मुर्ती चार फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. आरतीसाठी फक्त पाच लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवून करावयाची आहे.
गणेश उत्सव आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. दळवी यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत गावातील सर्व मंडळाच्या सदस्यांनी गावच्या सुरक्षेच्यादृष्टीने व गावामध्ये कायम एकोपा रहावा म्हणून गावातील युवकांनी त्यास अनुमती दिली. दुशेरेकरांची एकजूठ पाहून पोलिसांनी समाधान व्यक्त केले. दुशेरे या गावाने करोनाला हरवण्यासाठी घेतलेला निर्णय तालुक्यातील इतर गावांना आदर्शवत असल्याचे उदय दळवी यांनी सांगितले.
दुशेरे राबविणार “एक गाव एक गणपती’ उपक्रम
पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी गणेशोत्सवाचा खर्च गरजूंच्या मदतीसाठी वापरा, असे आवाहन केले. त्यानुसार सर्व गणेश मंडळांनी करोना संसर्गाच्या काळात “एक गाव एक गणपती’मुळे गणेश उत्सवाच्या खर्चाला फाटा दिला आहे. करोनाचा सामना करण्याकरता गावामध्ये मास्क, सॅनिटायझर, रोग प्रतिबंधक गोळ्या, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे उपक्रम राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला.