प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – समाजात सध्या अस्थिरता दिसते. गुन्हेगारी, हिंसा वाढत आहे. अशावेळी समाजाला आधाराची आवश्यकता आहे, ते काम गणेशोत्सव कार्यकर्ते करत आहेत. कोणाला अडचण आल्यास कार्यकर्ते हे मदतीस धावून जातात. हे कार्यकर्ते लोकांचा आधार ठरत आहेत, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त माणिकराव चव्हाण हे यंदाच्या लोकमान्य जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले. पोलीस शांतता कमिटीचे शेख मोहम्मद मुन्तखबुद्धीन यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. पुणे गणेश फेस्टिवल परिवार यांना गणेश सेवा पुरस्काराने तर धीरज घाटे, आनंद सागरे, प्रीतम शिंदे, प्रल्हाद थोरात, रफिक शेख, निलेश पवार यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, महेश सूर्यवंशी, डॉ. मिलिंद भोई, पुणे परिवारचे अध्यक्ष ऍड. प्रताप परदेशी, कार्याध्यक्ष शिरीष मोहिते, विनायक घाटे उपस्थित होते.
“गणेशोत्सवात काहीही चांगले किंवा वाईट झाले तर जबाबदारी आमची आहे. त्यामुळे सगळे पोलीस उत्सवादरम्यान झोकून काम करतील,’ असे आश्वासन गुप्ता यांनी दिले. गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे काम, आस्था, भक्ती त्यांचा त्याग आणि कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे ऍड. परदेशी म्हणाले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन,. घाटे यांनी प्रास्ताविक, प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.