रत्नागिरी – प्रतिक्षेत असलेला मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्याने नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. यातच आता गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गणपतीपुळे किनारपट्टीवर झाल्याने साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका जाणवत आहे. त्यामुळे समुद्र शांत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर गणपतीपुळ्यातील समुद्रकिनाऱ्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यात समुद्राचे पाणी तेथील दुकानांपर्यंत पोहचल्याचे दिसले.
याशिवाय मागील काही दिवसांपासून पर्यटकांची गणपतीपुळे येथे गर्दी होत आहे. तसेच समुद्रातील पाण्याचा आनंद घेत आहे. मात्र समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका जाणवत असल्याने खबरदारी म्हणून येथे पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.