नागपूर – ताडोबा अभयारण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी वाघाने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. वाघाने सफाई कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कर्मचारी जागीच ठार झाला.
ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेटवर ही थरकाप उडवणारी घटना घडली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी रामभाऊ रामचंद्र हनवते (वय- ५४) यांनी गेट जवळ सफाई केली. त्यांनतर ते गेट जवळील कवठाच्या झाडाजवळ गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पर्यटकांसमोर हनवते यांच्यावर हल्ला करत त्यांना फरफटत नेले. या हल्ल्यात सफाई कर्मचारी हनवते यांचा मृत्यू झाला.
५ ते ६ महिन्यांपूर्वी हनवते हे कंत्राटी कर्मचारी म्हणून निमढेला गेटवर रुजू झाले होते. हनवते यांचा मुलगा रणजित हनवते ताडोबा अभयारण्यात गाईडचे काम करतो. सकाळच्या सुमारास जंगल सफारीची सुरुवात असताना पर्यटकांसमोर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी ३ जानेवारी २०२४ रोजी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाकडी वनपरिक्षेत्रात तिच्या मुलीसमोर वाघाने हल्ला करून तिची हत्या केली. मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा. वाकडी जि. गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
दुसरीकडे, ७ जानेवारी २०२४ रोजी शेतातील कापूस वेचत असताना वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले होते. ही घटना अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ शिवारात घडली. सुषमा देविदास मंडल (५५, रा. चिंतलपेठ, जि. अहेरी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यामुळे आता नागरिकांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांना आळा घालण्याची मागणी होत आहे.