Gadchiroli-Chimur Lok Sabha। येत्या १९ एप्रिलला गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. याठिकाणचा प्रचार शेवटचा टप्प्यात पोहोचला आहे. तरी कुणाचे पारडे जड याचा अंदाज लावणे कठीण झालंय. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते तिसऱ्यांदा विजयी होणार असा दावा करतायेत. तर सत्ताविरोधी लाटेमुळे आम्हीच जिंकणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना आहे.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दोनवेळा मोदी लाटेत निवडून आलेले नेते यांना याहीवेळी तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. यंदा त्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसू शकतो. कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी रोषाचा सामना करावा लागतोय. तर रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामे, पक्षसंघटन आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रचारासाठी उतरलेली नेत्यांची फळी ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे सरकारी अधिकारी राहिलेले आणि गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते मागील काही वर्षांपासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. ते हलबी समजाचे प्रतिनिधित्व करतात. नेते यांची तिसरी टर्म असल्याने सत्ताविरोधी वातावरणाचा त्यांना लाभ मिळू शकतो. उमेदवारी देताना नवा चेहरा म्हणून त्यांना समोर करण्यात आले होते. त्यांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढले असल्याने त्यांचा विचार करण्यात आला. यामुळे दुखावलेल्या डॉ. उसेंडी, डॉ. चंदा व नितीन कोडवते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. सोबतच काही जुने नेते नाराज असल्याने बहुसंख्याक आदिवासी समाजातील नेतृत्व काँग्रेसमध्ये नावापुरते शिल्लक असल्याने याचा फटका किरसान यांना बसू शकतो.
प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांची धांदल Gadchiroli-Chimur Lok Sabha।
महायुती आणि मविआमध्ये नाराजी नाट्यानंतर शेवटच्या क्षणी भाजप आणि काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी त्यांना कमी वेळ मिळालाय. या गोष्टींमुळं सर्व मतदार संघात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांची धांदल होताना दिसून येतीय.
‘ही’ मते निर्णायक? Gadchiroli-Chimur Lok Sabha।
काँग्रेस भाजप व्यतिरिक्त रिंगणात असलेले ‘बीआरएसपी’ वंचित बहुजन आघाडी, बीएसपी आणि अपक्ष उमेदवार किती मते घेणार यावर देखील विजयाचे गणित अवलंबून आहे. मागील तीन निवडणुकांचा विचार केल्यास वंचित आणि बीएसपी यांना एक लाखाच्यावर मते मिळाली होती. पण यंदा दोन्ही पक्षाने दिलेले उमेदवार फार प्रभावी नसल्याने ही मते कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच बहुसंख्याक आदिवासी समाज यावेळी कुणाच्या पाठीशी उभा राहतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.