गुवाहाटी – हिंसाचार उफाळल्याने आसाम-मिझोरम सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. अशात सोमवारी झालेल्या गोळीबारात आसामचे 6 पोलीस मृत्युमुखी पडले. त्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील सीमेवर शांतता प्रस्थापित होण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला आहे.
आसाम आणि मिझोरम ही राज्ये एकमेकांवर आपल्या हद्दीत अतिक्रमण करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातून जूनच्या अखेरपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सीमाभागात हिंसक घटना घडत आहेत.
त्या हिंसाचारावेळी काही शेतकऱ्यांच्या झोपड्यांची जाळपोळ करण्यात आली. हिंसाचार थांबावा यासाठी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काही समाजकंटकांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये आसामचे सुमारे 50 पोलीस जखमी झाल्याचे समजते.
समाजकंटकांनी गोळीबाराबरोबरच दगडफेकही केली. सीमेवरील तणावावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वासर्मा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्यात ट्विटरवरून शाब्दिक युद्ध रंगले.
दरम्यान, आसाम-मिझोरम सीमेवरील तणावाची दखल केंद्र सरकारने घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सीमावादावर सहमतीतून तोडगा काढला जावा. सीमेवरील शांततेसाठी पाऊले उचलली जावीत, अशी सूचना शहा यांनी त्यांना केली.