नवी दिल्ली – लॉकडाऊननंतर परिस्थितीत पूर्ववत होत असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टी अजूनही भक्कम आहे. सन 2020-21च्या उत्तरार्धामध्ये “आत्मनिर्भर’ योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन राज्यसभेत म्हणाल्या. तसेच करोनाच्या लाटेमुळे आलेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निर्मला सितारामन म्हणाल्या, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या अनेक तिहामहींदरम्यान बॅंकेने अतिरिक्त चलन छापावे आणि सरकारने नोटा सर्व सामान्यांना तसेच छोट्या उद्योजकांना वाटावेत, असा सल्ला काही अर्थतज्ज्ञांकडून देण्यात आला होता.
करोना कालावधीमध्ये ज्या छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला त्यांना पैसे देण्याची मागणी केली जात होती. थेट आर्थिक मदत किंवा नोकरदारांना या अतिरिक्त छापण्यात आलेल्या पैशातून मदत करावी, असे म्हटले जात होते.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भारताचा जीडीपीची वाढ ही 14.4 टक्के इतकी असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर आरबीआयच्या नव्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने 4 जुलै 2021 रोजी संमत केलेल्या अहवालानुसार भारताच्या जीडीपीची प्रत्यक्ष वाढ ही सन 2021-22 च्या आर्थिक वर्षात 9.5 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली. दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याने पूर्वी 10.5 टक्के अपेक्षित वाढ ही आणखीन एका टक्क्याने कमी करण्यात आली.
मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून विकासदर व महागाईचे गणित योग्य पद्धतीने बांधत दिर्घकालीन विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही निर्मला म्हणाल्या.