नगर, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या वतीने रस्ते विकासासाठी पाच वर्षात जिल्ह्यातील विविध रस्त्यासाठी १ हजार ४७ कोटी ८६ लाखांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (एनएच ५६१) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी ६५१ कोटी १५ लाख, बेल्हा ते शिरूर ३८ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ३८६ कोटी १६ लाख आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी- श्रीगोंदा- आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे विखेंनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध कामांसाठी नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे मागणी केली होती. दरम्यान या मागणीवर योग्य तो पाठपुरावा केला. आणि आज सदरील भरीव निधी हा या रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे. एक लोकप्रतिनिधी या नत्याने सरकारकडे पाठपुरावा करतो, तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतो या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो.
कारण प्रामाणिकपणे विकास कामे मार्गी लावणाऱ्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही निधीची कमतरता भासत नाही. त्याची विकासकामे ही सर्वांना दिसत असतात, असे मत देखील यावेळी खा. विखे यांनी मांडले.