नाशिक : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी आपल्या नाशिक येथील निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करत दिवा लाऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करून जयंती साजरी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता ज्ञानाचा दिवा लावून महात्मा फुले यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन खासदार शरदचंद्र पवार यांनी केले होते. त्यानंतर भुजबळ यांनी आपआपल्या घरात प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून साजरी करण्यात येऊन शासनाच्या सोशल डिस्टन्स सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात घराघरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आपल्या नाशिक येथील निवासस्थानी महात्मा फुले यांची जयंती साजरी केली.
जयंती साजरी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,स्त्रियांना शिक्षणाची कवाड खुली करून दिलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा गांधींनी महात्मा असं म्हटले होते. महात्मा फुले यांनी त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बहुजन समाजातील नागरिकांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून पाणी प्यायला उपलब्ध करून दिलं. त्यांना घरातघेत बरोबर जेवण घेतलं. त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठं योगदान देत गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच समाजातील गरिब व बहुजन समाजातील नागरिकांसाठी त्यांनी काम केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी दगड धोंडे खाऊन त्यांना शिकवण्याचे काम पूर्ण केलं. शाळा उघडल्या, त्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या महिला मुख्यध्यापिका बनल्या. इंग्रज सरकारने त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचे रायगडावरील समाधी पहिल्यांदा शोधून काढून पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकातून लोकांच्या ज्ञानात भर घातली गेली. शिवाजी महाराजांनी या देशांमध्ये पहिली राज्यक्रांती घडविली तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशांमध्ये पहिली समाजक्रांती घडवून आणली, अशा या महात्म्याच्या विचारांचे आज आपण स्मरण करूया, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.