अहमदनगर – देशभरात इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे महागाई वाढते. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अव्वाच्या सव्वा कर लावल्यामुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस आमदारांनी आणि मंत्र्यांनी सायकलने विधानभवनात प्रवेश करून निषेध नोंदवला होता. असाच काहीसा निषेध अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात नोंदविण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावात एक विवाह पार पडला. करोनाचे नियम पाळून हा विवाह झाला. त्यामुळे मोजकेच वऱ्हाडी लग्नात उपस्थित होते. ज्ञानेश्वरी विठ्ठल वामन या नववधूचा विवाह जोर्वे गावातील अधिराज मुकेश काकड याच्याशी झाला. लग्न आटोपल्यानंतर या नवदाम्पत्याची गाडीने नव्हे तर चक्क बैल-गाडीतून विदाई करण्यात आली. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करत दाम्पत्याला बैल-गाडीतून पाठविण्यात आले.
इंधन दरवाढीचा निषेध करत या नवदाम्पत्याने कोल्हेवाडी ते जोर्वे हे ५ किमीचे अंतर बैल-गाडीने पार केले. या अनोख्या विदाईची चर्चा अहमदनगरमध्ये चांगलीच रंगली आहे. विशेष करून संगमनेर तालुक्यात या निषेधाचं कौतुक होत असल्याचं समजत.