नगर -करोनामुळे संकटाचा संपूर्ण जीवसृष्टीवर परिणाम झालेला आहे. त्यातून मनुष्याबरोबरच वन्यप्राणीही सुटलेले नाहीत. नगर जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिकस्थळी असलेल्या वन्यप्राण्यांवर टाळेबंदीमुळे पर्यटक येत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी नगरमधील “स्पर्श’ या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला आहे.
करोनामुळे संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांनाही मदतीची गरज आहे मात्र, त्याकडे कुणाचेही अजून फारसे लक्षच गेलेले नाही. नगरच्या “स्पर्शया सेवाभावी संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिथे जिथे वन्यप्राण्यांची उपासमार होत आहे, अशा ठिकाणी जाऊन त्यांना विविध फळे व अन्न पुरवण्याचा उपक्रम या संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पारनेर तालुक्यातील श्री दर्याबाई देवस्थान, वडगाव दर्या व येसूबाई देवस्थान वेसदरे याठिकाणी असणाऱ्या माकडांना फळे कलिंगड, केळी, चिकू, बिस्किटे, मुरमुरे, फुटाणे, कांदे इत्यादी खाद्यपदार्थ देऊन त्यांची भूक भागवली आहे. स्पर्श संस्थेच्या वतीने दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दानशुरांनी केलेल्या मदतीमधून स्पर्श संस्थेचे उमेश क्षीरसागर, कैलास उमाप, सतिश परांडे, अमोल आल्हाट, संदीप गांगर्डे, प्रवीण साळवे आदींची हा उपक्रम राबविला.
या सामाजिक उपक्रमास देवेंद्र गांधी, मनोज गांधी, चंदन भळगट, रशीद शेख, मच्छिंद्र भुसारी, केक टाउन भिंगार, गौतम बहादुर्गे, राजेंद्र ठोंबरे, सुनील गायकवाड आदींनी मदतीचा हात पुढे केला आहे. वन्यप्राण्यांसाठी सर्वांनीच पुढे यायला हवे, अशी भूमिका संस्थेने व्यक्त केली.
संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. वन्यप्राण्यांची कोणत्याही प्रकारे उपासमार होणार नाही. त्यासाठी स्पर्श संस्थेने एक छोटासा प्रयत्न सुरु केला आहे. जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांना तातडीने मदत पोचणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील दानशुरांनी आपल्या निसर्गाची संपत्ती वाचवण्यासाठी या कार्यामध्ये मदत करून स्पर्श संस्थेच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क: 9075512802.