अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर इसिसकडून त्यास सुरूंग लावण्याचा प्रयत्न होत आहे. तालिबानकडून त्यास प्रत्युत्तर दिले जात असले तरी हल्ल्यांची वाढती संख्या पाहता अफगाणिस्तानात हिंसाचाराचे नवीन पर्व सुरू होऊ शकते. ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाला चिंता करायला लावणारी आहेच, त्याचबरोबर तालिबानला देखील जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी अडथळा आणणारी आहे.
तालिबानच्या संदर्भात जुन्या गोष्टी पुन्हा होऊ नये व अफगाणिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थळ बनू नये यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढाकार घेत प्रमुख देशाच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक बोलावली होती. त्यात एक ठरावही संमत करण्यात आला आहे. ते एक सकारात्मक आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल समजायला हवे. अलीकडेच काबूलच्या एका सैनिकी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने तालिबानला मोठा धक्का बसला.
हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी तालिबानने प्रयत्न केले असले तरी त्यात किमान 20 जण मारले गेले. तालिबानचा एक वरिष्ठ अधिकारी मौलवी हमदुल्लाह यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. हमदुल्लाह हा काबूलच्या आर्मी कोअरचा कमांडर होता. या हल्ल्यात त्याचा खरोखरच मृत्यू झाला असेल तर तालिबानदेखील या हल्ल्याला जोरात प्रत्युत्तर देईल.
परिणामी अफगाणिस्तानात नवा रक्तरंजित खेळ सुरू होऊ शकतो. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच 19 ऑगस्ट रोजी इसिसने इशारा देत आपले दहशतवादी जिहादची तयारी करत असल्याचे जाहीर केले. हा हल्ला त्याचाच भाग मानला जातो. इसिसने याच रुग्णालयावर 2017 रोजी हल्ला केला होता. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील खुरासन येथे इसिस सक्रिय असून त्याने तालिबानला कमकुवत करण्यासाठी मोहीम उघडली आहे.
या अभियानात आतापर्यंत 68 जण मारले गेले आहेत. प्रामुख्याने या हल्ल्यात तालिबानच्या दहशतवाद्यांना टार्गेट केले जात आहे. शिया अल्पसंख्याकांवरही हल्ले केले जात आहेत. विशेष म्हणजे तालिबानने अल्संख्याकांना सुरक्षा देण्याची हमी दिली आहे; परंतु आतापर्यंतचे हल्ले पाहता ती आश्वासने पोकळ ठरली आहेत. तालिबानकडून इसिसचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण काबूल दवाखान्यावरील हल्ला हा इसिस सक्रिय असल्याची साक्ष देतो. यासंदर्भातील इसिसची प्रतिक्रिया त्यांचे मनसुबे सांगणारी आहे.
त्यांनी म्हटले की, सैनिकी रुग्णालय हे आपल्या शत्रूचे होते आणि मृतांत तालिबानच्या सदस्याचा देखील समावेश होता. तेथे सामान्य नागरिक नव्हते. तालिबानचा संरक्षणप्रमुख मुल्ला मोहंमद याकूबने दवाखान्याला भेट दिल्यानंतर काही दिवसांनीच हल्ला केल्याचे इसिसने म्हटले आहे. याकूब हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा आहे. रुग्णालय भेटीदरम्यान याकूब हा प्रथमच सार्वजनिक रूपात दिसला. तालिबान मात्र इसिसचा हल्ला हाणून पाडल्याचा दावा करत आहे. त्याच्या मते, सुरक्षा दलाने इसिसचा हल्ला परतावून लावला.
रुग्णालयापर्यंत पोहोचण्याअगोदरच इसिसच्या दहशतवाद्यांना रोखल्याचे म्हटले आहे; परंतु तालिबान शासन अस्थिर करण्यासाठी इसिसने 18 सप्टेंबरपासून मोहीम उघडली आहे. ऑगस्ट महिन्यांत काबूल विमानतळावर देखील इसिसने हल्ला केला होता. परंतु त्यावेळी तालिबान टार्गेट नव्हते. बहुतांश हल्ले उत्तर नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथे झाले. तेथे आतापर्यंत 41 हल्ले झाले.
इसिसने काबूलमध्ये सात, कुनारमध्ये सहा, परवानमध्ये तीन, कुडुंझ आणि कंदहार येथे प्रत्येकी एक हल्ला केल्याचा दावा केला आहे. कंदहार हा तालिबानचा गड मानला जातो. या हल्ल्यात तेल टॅंकर, मूलभूत सुविधा जसे की, वीजपुरवठा करणारे पोल आणि रुग्णालयाला टार्गेट करण्यात आले. तालिबानचा उपप्रवक्ता बिलाल करिमीने एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की, अफगाणिस्तामध्ये इसिसचे अस्तित्व नाही. तालिबानकडून इसिसचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू असताना अफगाणिस्तानात मात्र लहानमोठे हल्ले होत आहेत.
यात लोकांचा हकनाक बळी जात आहे. हल्ले सुरूच राहिले तर तालिबानची प्रतिमा आणखी बिघडू शकते. एकीकडे तालिबान आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्षम प्रशासक म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकदेखील तालिबानला कमकुवत समजू लागतील आणि ही बाब तालिबानला सत्ता चालवण्यासाठी अडचणीची राहू शकते.
अफगाणमध्ये शांतता आणि स्थैर्य असणे आवश्यक आहे. त्याकरता भारत आणि रशिया व अन्य राष्ट्रे मोलाची भूमिका बजावू शकतात. दहशतवाद मग तो कोणाचाही कोणाच्याही विरोधात असो तो जोपर्यंत समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत जग शांत होणार नाही.