राहूल गोखले
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे तेथील वातावरण किती विखारी होण्याचा धोका आहे याची चुणूक आतापासूनच दिसू लागली आहे.
अन्य काही राज्यांत उत्तर प्रदेशबरोबर तर इतर काही राज्यांत पुढील वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत हे खरे. तथापि, उत्तर प्रदेश हेच सर्वांत लक्षवेधी राज्य आहे हे नाकारता येणार नाही आणि म्हणूनच या राज्यावर सर्वच पक्ष लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, आपल्या पक्षाचा प्रचार करणे आणि राजकीय-सामाजिक वातावरण गढूळ करणे यात फरक असतो. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या वेळी वातावरण किती कलुषित झाले होते आणि त्याचे पडसाद हिंसाचारात कसे उमटले याचे स्मरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशात तशाच विखारी वातावरणाच्या निर्मितीची शक्यता दिसते आहे आणि ते धोकादायक आहे.
राजकीय पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही थराला जाताना संकोच बाळगला नाही तर निवडणुका झाल्यानंतर देखील वातावरण तसेच गढूळ राहते आणि साहजिकच त्याने समाजात भेद वाढतात. उत्तर प्रदेशात हे होऊ नये अशी सुजाणांची कितीही इच्छा असली तरी राजकीय पक्षांनी वातावरण कलुषित करण्याचा चंगच बांधला असेल तर किमान मतदारांनी तरी त्यास बळी न पडण्याचा समंजसपणा दाखवायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उत्तर प्रदेशात झंझावाती दौरे होणार आहेत. या दौऱ्यांमध्ये हे दोघे भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकतील आणि अयोध्येपासून लव्ह जिहादपर्यंतचे मुद्दे यात असणार यात शंका नाही. याचे कारण शेतकरी आंदोलनापासून महागाईपर्यंतचे मुद्दे भाजपसाठी सोयीचे नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षांत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली विकास झाल्याचा दावा भाजप करीत असतो.
मात्र, त्या मुद्द्यांपेक्षा अयोध्या, 370 वे कलम, लव्ह जिहाद हे मुद्दे वरचढ ठरले तर भाजप ध्रुवीकरण करू इच्छितो असे मानता येईल. पश्चिम बंगालमध्ये हाच प्रयोग वापरून ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला होता. पण पश्चिम बंगालपेक्षा उत्तर प्रदेशची स्थिती निराळी आहे आणि ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात, अशा संभाव्य ध्रुवीकरणाचा प्रयत्न केवळ भाजपकडून होईल असे मानणे अर्धसत्य ठरेल.
याचे कारण समाजवादी पक्षाने आतापासूनच असे संवेदनशील मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एका सभेत बोलताना मोहम्मद अली जीना यांची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, “सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि जीना हे एकाच संस्थेतून बॅरिस्टर झाले आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले’.
जीना हे सेक्युलर होते अशा आशयाचे उद्गार भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी काही वर्षांपूर्वी काढले होते. तेव्हा संघपरिवारात मोठा रोष उत्पन्न झाला होता आणि आडवाणी यांना भाजपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा अखिलेश यादव यांना त्यांच्या या विधानावरून भाजप लक्ष्य करणार हे ओघानेच आले. वास्तविक जीना आपल्या प्रारंभीच्या काळात लोकमान्य टिळकांचेही भक्त होते हा इतिहास जसा बदलता येत नाही तद्वत जीना हे द्विराष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आणि देशाची फाळणी करून पाकिस्तानच्या निर्मितीचे जनक होते हाही इतिहास नाकारता येत नाही.
मात्र, वादग्रस्त विधाने हेतुपुरस्सर करून प्रचाराला अकारण धार्मिक रंग देण्याचा हा प्रकार आहे हे उघड आहे. एरव्ही जीना यांचा विषय सरदार पटेलांना श्रद्धांजली वाहताना आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काढण्याचे कारण नव्हते. या विधानावरून अपेक्षेप्रमाणे भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात वाक्युद्ध पेटले आहे. आदित्यनाथ मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने तर अखिलेश यांची “नार्को’ चाचणी घेण्याची मागणी केली आहे आणि अखिलेश यांनी आपल्या टीकाकारांनी इतिहासाच्या पुस्तकांचे अध्ययन करावे, असा सल्ला दिला आहे.
एका तक्रारीवरून हे प्रकरण न्यायालयात देखील पोहोचले आहे. हा सगळा गदारोळ कमी म्हणून की काय म्हणून “एसबीएसपी’ या समाजवादी पक्षाच्या मित्रपक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी “जीना देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर देशाची फाळणी टळली असती’ असे विधान केले आहे. याच राजभर यांनी काही दिवसांपूर्वी तुरुंगात जाऊन गुन्हेगार मुक्तार अन्सारीची भेट घेतली होती आणि अन्सारीला निवडणुकीत पाठिंबा देऊ असे जाहीर केले होते.
तेव्हा या सगळ्याची दिशा ही शक्य तितके धार्मिक ध्रुवीकरण व्हावे अशीच दिसते. समाजवादी पक्षाच्या अशा मुद्द्यांचा समाचार घेण्याची संधी भाजपला आपसूक मिळते एवढेही भान अखिलेश यांना नाही, असे समजणे भाबडेपणाचे. तेव्हा हे मुद्दामच करून ध्रुवीकरण करण्याची त्यांची व्यूहनीती आहे अशी शंका येण्यास वाव आहे. खरे म्हणजे निवडणुकांत विकासाचे, लोकशाहीचे मुद्दे यायला हवेत ही अपेक्षा एकूण राजकारणाचा पोत पाहता अवाजवी ठरण्याची शक्यताच अधिक.
मात्र, राजकारण्यांच्या अशा खेळांना मतदार किती काळ भुलणार हाही प्रश्न आहे. एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांनी “भारतीय मुस्लिमांना जीना यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही’ असे म्हटले आहे आणि ती प्रतिक्रिया अखिलेश यांच्या विधानाच्या तुलनेत अधिक पोक्त म्हणायला हवी. पण प्रश्न तो नाहीच. मुळात मूलभूत मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा वादग्रस्त विधानांची राळ उडवून द्यायची हा राजकीय नेत्यांचा हातखंडा प्रयोग आहे आणि उत्तर प्रदेशात त्याची झलक दिसू लागली आहे. इतिहासाचा प्रांत हा अभ्यासकांचा आहे;
राजकीय नेत्यांनी जाता-येता इतिहासावरून आपल्या मताची पिंक टाकून जाण्याने इतिहासाच्या सम्यक ज्ञानात भर तर पडतच नाही पण वर्तमान मात्र कलंकित होऊन जातो. समाजवादी पक्षाने आपल्या पक्षाच्या चिन्हाच्या तांबड्या-हिरव्या रंगाच्या बाटल्यांमधून नुकतेच “समाजवादी सुगंध’ हे अत्तर “लॉंच’ केले. देशभरातून वापरण्यात आलेल्या 22 जिन्नसांपासून हे अत्तर तयार करण्यात आले आहे आणि त्यातून जनतेला “समाजवादाचा सुगंध’ येईल असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. अत्तरातून समाजवादाचा “सुगंध’ येवो अथवा न येवो, तत्कालिक राजकीय लाभासाठी प्रचारात ध्रुवीकरणाचा दर्प वा दुर्गंधी येता कामा नये ही खबरदारी राजकीय पक्षांनी घ्यावी.