स्वप्निल श्रोत्री
कोणत्याही विषयाला हात घालताना त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते. व्यक्तीने एक तर पूर्ण ज्ञानी असावे नाही तर अज्ञानी असावे, परंतु अर्धज्ञानी असू नये.
केतकी चितळे आणि वाद महाराष्ट्राला नवीन नाही. आपल्या अभिनयापेक्षा सतत काहीतरी विवादास्पद वक्तव्ये करून वाद ओढवून घेण्यासाठी केतकी जास्त प्रसिद्ध आहे. नुकतीच तिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकात्मक कविता समाज माध्यमांद्वारे प्रसिद्ध करून वाद ओढवून घेतला.
केतकीच्या कवितेने महाराष्ट्रभर गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी तिला नवी मुंबईतून अटक करून न्यायालयात हजर केले असता तिने न्यायालयात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि त्यानंतर जो काही घटनाक्रम घडला तो माध्यमांनी विस्तृतपणे मांडला आहे. आपल्या लेखाचा विषय हा केतकी चितळे, तिने घातलेले वाद किंवा तिचे पुढे काय होणार, हा नसून अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आणि त्याचा गैरवापर कसा केला जातो, हे समजून घेणे हा आहे.
राज्यघटनेची पार्श्वभूमी
भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या धोरणांचा पुरस्कार केला आहे. अर्थात, भारतीय नागरिकांना फक्त राजकीयच नाही तर नैतिक स्वातंत्र्यसुद्धा राज्यघटनेने दिलेले आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 कलम 12 ते कलम 35 नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची ग्वाही देते. त्यात प्रामुख्याने समानतेचा हक्क (कलम 14 ते कलम 18), स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते कलम 22), शोषणविरोधी हक्क (कलम 23 ते कलम 24), धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते कलम 28), सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 व कलम 30) आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क (कलम 32) यांचा समावेश होतो.
येथे एक गोष्ट नमूद करणे गरजेची आहे की, वरील सर्व अधिकार राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिले असले, तरी ते अनिर्बंध नाहीत. प्रत्येक अधिकारावर काही ना काही बंधने ही राज्यघटनेने घातलेली आहेत. उदाहरणार्थ, कलम 25 अनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार आहे. परंतु, धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मांतर करणे असा होत नाही. थोडक्यात, आपल्या घटनाकारांनी अधिकार देताना त्याबरोबर कर्तव्याची सुद्धा सांगड घातलेली आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय?
भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 (अ) मध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आढळतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला आपले मत किंवा आपला दृष्टिकोन मांडण्याचा पूर्ण अधिकार असणे. कोणतीही भारतीय व्यक्ती आपले मत, आपला दृष्टिकोन किंवा इतरांचे मत किंवा त्यांचा दृष्टिकोन तोंडी, लेखी, चित्रफीत, मुद्रित व इतर अशा कोणत्याही प्रकारे व्यक्त करू शकते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही भारतीय राज्यघटनेने समाजाला दिलेली देणगी आहे. परंतु त्यावर अनेक बंधनेसुद्धा घातली आहेत. उदाहरणार्थ, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीकडून देशाची सुरक्षा, अखंडता व संप्रभुता धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक शांतता, हिंसेला प्रोत्साहन देणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, सभ्यता आणि नैतिकता, न्यायालयाचा अवमान करणे तसेच एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करणे इत्यादी कारणांसाठी न्यायालय (अर्थात, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय) व्यक्तीच्या अधिकारावर बंधने घालू शकते.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वाढता गैरवापर
कृषी कायद्यांसंबंधित संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आपले अधिकार माहीत असतात परंतु, कर्तव्य नाही असे म्हटले होते. संसदेतील विषय आणि कृषी कायद्यासंबंधित शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता अनेकांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थांनी यथार्थ आहे. आज विविध वृत्तपत्रे, चॅनेल, वेबसिरीज, चित्रपट, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात ज्या पद्धतीची भाषा एकमेकांप्रती वापरली जाते ती कोणत्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यात येते याचा विचार होणे गरजेचे आहे.
आजच्या काळात व्यक्त होण्याचे सर्वात सोपे साधन समाज माध्यमे (फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर इ.) असल्यामुळे समाज माध्यमांवर एखाद्या व्यक्तीचे ज्या पद्धतीने चारित्र्यहनन केले जाते ते पाहता भारतीय राज्यघटनेने नागरिकांना जे अधिकार दिले आहेत त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. अधिकारांबरोबर कर्तव्येसुद्धा येत असतात. सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवणे हा माझा अधिकार आहे. परंतु, माझ्या वाहन चालविण्याने इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.
कोणत्याही विषयाला हात घालताना त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते. व्यक्तीने एक तर पूर्ण ज्ञानी असावे नाहीतर अज्ञानी असावे, परंतु अर्धवट (अर्धज्ञानी) असू नये, असे चाणक्याने म्हटले होते. एखाद्या विषयाचे अपूर्ण ज्ञान व्यक्तीला कसा धोका देते ते केतकी चितळेकडे पाहून लक्षात येते.