प्रा. नितीन मटकरी
समर्थ एका ठिकाणी म्हणतात-
देहबुद्धी नेणो काही ।
दास अंकित रामापायी।।
देवाच्या चरणाशिवाय दुसरे काहीही न सुचणे म्हणजे अंतर्बाह्य देवाचेच होणे. सख्य भक्तीमध्ये सर्वच गणगोत, मित्र मंडळी यांच्या स्थानीही देवाचं अधिष्ठान दिसू लागते, इतकी एकरूपता देव-भक्तांमध्ये तयार होते.
कृष्ण माझी माता । कृष्ण माझा पिता। कृष्ण माझा गुरू। कृष्ण माझा सखा। अशी अवस्था म्हणजे सख्य भक्तीचा आविष्कार. देव मनात बसला की मग संपूर्ण मनाचे, देहाचे नियंत्रणच देवाचे होते. प्रत्येक कृती ईश्वराची होते आणि भक्त विश्वात्मक व सर्वव्यापी ईश्वराचे सख्य अनुभवतो. त्यासाठी सर्व काही देवाचे आहे, हा भाव असणे गरजेचे आहे. रज, तम, सत्व अशा तीन गुणांची रचना देहासोबतच केलेली आहे. देह पंचमहाभूतांचा आणि अंगीभूत रचना. रज, तम, सत्व या गुणांची अशी एकंदरीत चौकट आखूनच मानवाचे मार्गक्रमण होत असते. रजोगुणानेच मानव निर्मिती झाली म्हणून त्याची आवश्यकता आहे. मग तमोगुणी मानव हा अध्यात्मिक मार्गक्रमात तमोगुण मागे टाकूनच येऊ शकतो. या तम सारून सत्वाचे आचरण करणे गरजेचे ठरते. म्हणून सत्व गुणी मानव हाच अध्यात्मिक मार्गाचे पालन करतो अथवा अध्यात्मिक मार्गाने सत्वगुणाची वाढ होऊन तम आणि रज गुण कमी होतात. तुकाराम महाराज गुरूपदाच्या अभंगात म्हणतात-
रज तम सत्व आहे ज्याचे अंगी।
याच गुणी जगी वाया गेला ।।
तम म्हणजे काय नरकाची केवळ। रज तो सबळ मायाजाल।
तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य।
करावीशी परमार्थ अहर्निशी ।।
सत्व गुणांची जेव्हा रज आणि तम गुणांवर मात होते तेव्हा सात्विक भक्तीचा आविष्कार होतो आणि मग देहबुद्धी विसरून भक्तिमार्गाने परमेश्वराशी एक रूप होतो हीच अवस्था सख्य निर्माण करणारी असते. सख्य भक्ती म्हणजे पराकोटीची साधना जी सातत्याने, भक्तिभावाने, निष्ठेने करायची आहे. त्यासाठी मनाचा निग्रह व कोणत्याही प्रसंगात निष्ठा ढळणार नाही एवढी प्रखर साधना आवश्यक. या एकरूपतेनेच माता, पिता, बंधू, सखा सर्वकाही देवच हा समर्पित अनुभव भक्त अनुभवतो.