– संदीप घिसे
पिंपरी – श्वेता आणि महेशचा विवाह 14 वर्षापूर्वी झाला. प्रत्येकाच्या संसारात असतात तशा कुरबूरी त्यांच्याही संसारात सुरू होत्या. मात्र त्यानंतर या तक्रारींनी गंभीर स्वरूप धारण केले. पती महेश हे पीएमपीमध्ये कामाला होते. पहाटे साडेपाच वाजताच्या ड्युटी असल्याने त्याला पाच वाजताच घराबाहेर पडावे लागत असे. मात्र पत्नी श्वेता ताजे अन्न न देता रात्रीचे शिळे अन्न देते असल्याचा राग महेशच्या मनात होता. तर दुसरीकडे मी देखील कामाला जात असल्याने एवढ्या पहाटे उठून डबा करणे मला शक्य नसल्याचे पत्नी सांगत होती. याशिवाय मुलांनाही डबा करून द्यावा लागतो, असे श्वेता यांचे म्हणणे होते. परंतु आपल्याला दररोज बाहेरचे खाणे परवडत नसल्याचे महेशचे म्हणणे होते. आपली छळवणूक होत असल्याचा अर्ज महेशने पोलिसांच्या महिला सहायक कक्षाकडे केला.
उपनिरीक्षक मनीषा दशवंत यांनी महेश आणि श्वेता यांना चर्चेसाठी बोलविले. त्यावेळी महिला सहाय्यक कक्ष नव्याने सुरू झाला होता. त्यामुळे समूपदेशकही नव्हते. पोलीस कर्मचारी अनिता जाधव आणि अपर्णा शिंदे यांनी श्वेता आणि महेश यांच्या बाजू ऐकून घेतल्या. डब्यावरून सुरू झालेले प्रकरण आता चारित्र्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. बसमधील एक प्रवासी तरुणीला महेश फोन का करतात, आपल्या नातेवाईक महिलेशी महेशचे संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला. आपण त्यांचा मोबाईल पाहिला असून त्यातून ही माहिती समोर आल्याचे तिने सांगितले. मग पती महेशनेही तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. ही देखील सोशल मीडियावर सतत ऑनलाइन असते. हिचेही कोणासोबत तरी काहीतरी सुरू असल्याचा आरोप केला.
डब्यावरून सुरू झालेले हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षक दशवंत यांनी दोघांनाही समजावून सांगितले. तुम्हाला 10 आणि 12 वर्षाची मुले आहेत. तुम्ही भांडलात तर मुलांवर काय परिणाम होईल? तुम्ही वेगळे झालात तर त्यांच्या भविष्याचे काय होणार, मुलांना आई आणि वडील या दोघांची गरज असते. याशिवाय पतीच्या पगारावर आपले घर चालत असल्याने त्यांना ताजा जेवणाचा डबा देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच पतीच्या संशयास्पद वर्तणुकीबाबतही चार शब्द सुनावले. त्या दोघांनाही आपली चूक समजली. त्या दोघांनीही आपल्या वर्तणात सुधारणा करण्याची हमी पोलिसांना दिली. या गोष्टीला आता वर्ष झाले आहे. पोलीसही त्या दोघांची विचारपूस वेळोवेळी करतात. आता आमचा संसार सुखाचा सुरू असल्याचे समाधान पोलिसांनी या वेळी व्यक्त केले.
कामावर जाताना पत्नी डबा करून देत नाही. दररोज शिळे अन्न देऊन माझा छळ करते, अशी तक्रार पतीने पोलिसांच्या महिला सहायक कक्षाकडे केली. डब्यावरून होणारे भांडण अगदी विकोपाला गेले. या भांडणात दोघांनीही ऐकमेकांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडविले. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा पडला. अत्यंत छोट्या प्रश्नावरून “त्यांचा’ संसार मोडण्याच्या स्थितीत पोहोचला होता. मात्र, थोडीशी जरी समजुतीची भूमिका घेतली तर संसार वाचू शकतो आणि सुखाचा होऊ शकतो. संसार करताना एकमेकांना समजून घेण्यातच हित दडलेले असते.