नवी दिल्ली – आपल्या कठोर परिश्रमाने आपण भारतात आणि भारताबाहेरही आपल्याला सिद्ध केले आहे. आपले संविधान आणि लोकशाही परंपरेचा आपल्याला आभिमान आहे. लोकशाहीची माता असलेला भारत आपली लोकशाही अधिक बळकट करत आगेकूच करत आहे. भारतची कामगिरी आणि यश संपूर्ण मानवतेसाठी आशा दायी आहे. भारताच्या विकासाचा प्रवास हा आत्मनिर्भरतेवर आधारित असून संपूर्ण जगाच्या विकासाला गती देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून पदयात्रेला (स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. “आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे.
साबरमती आश्रम येथे उपस्थिताना संबोधित करताना “आजादी का अमृत महोत्सव’ या 15 ऑगस्ट 2022 पूर्वी 75 आठवडे सुरु होणाऱ्या आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी केले. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्य सैनिकांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.
नरेंद्र मोदी म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची 1857ची पहिली लढाई, महात्मा गांधीजींचे परदेशातून आगमन, सत्याग्रहाच्या सामर्थ्याचे देशाला स्मरण, संपूर्ण स्वराज्याची लोकमान्य टिळक यांनी दिलेली हाक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचा “दिल्ली मार्च’ आणि “चलो दिल्ली’ ही घोषणा यासारख्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्वाच्या घटनांचे स्मरण पंतप्रधानांनी केले.
स्वतंत्र्य लढ्याची ही ज्योत, प्रत्येक दिशेने, प्रत्येक भागात सातत्याने धगधगती ठेवण्याचे कार्य देशातल्या आचार्य, संत आणि शिक्षकांनी केले. भक्ती चळवळीने स्वातंत्र्य आंदोलनासाठी देशव्यापी पाया सज्ज केला. तसेच प्रत्येक राज्यातला, प्रत्येक प्रांतातला हा इतिहास जतन करण्याचे गेली सहा वर्षे जाणीवपूर्वक काम देश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करण्यासाठीचे देशाचे प्रयत्न पूर्णत्वाला नेण्यासाठी युवा आणि विद्वानांनी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वातंत्र्य लढ्यातली कामगिरी जगासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या इतिहासातल्या अनोख्या कहाण्या शोधून त्या मांडण्याचे आवाहन त्यांनी कला, साहित्य, चित्रपट जगात आणि डिजिटल माध्यमाशी निगडीत व्यक्तींना केले.