इंदापूर, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा विकास अधिक गतीने होण्यासाठी, नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार यांच्याबरोबर आम्ही काम करणार आहोत. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत आजपासूनच प्रचार सुरुवात करत आहोत, अशी ग्वाही माजी सभापती प्रवीण माने यांनी दिली.
इंदापूर शहरातील सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या निवासस्थानी रविवार (दि.७ ) पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले होते. यावेळी प्रवीण माने बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेश जामदार,शिवाजी तरंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवीण माने पुढे म्हणाले की,दशरथ माने यांचे माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबीयांसमवेत राहिलेलं आहे.त्यातच राज्याच्या राजकारणात अनेक बदल झालेले आपण पाहतो आहोत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व अजित पवार यांची राजकीय ताकद वाढवण्यासाठी, माने परिवार, सोनाई परिवाराने खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
इंदापूर बारामती दौंड या तालुक्यामध्ये व संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य,योगदान मोठे आहे.मोती बिंदूच्या शस्त्रक्रिया गिनीज ऑफ रेकॉर्ड करण्याचा मान सुनेत्रा पवार यांनी निर्माण केला आहे. टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून महिलांना काम देण्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे.अजित पवार हे राज्यातील खमके नेते आहेत. सकाळी सहा वाजण्यापासून ते जनतेची कामे करतात. नुसत्या व्यापाराच्या निवेदनावर, पुलाचा ब्रिजचा प्रश्न मार्गी लावला आहे.
माने यांच्या निर्णयामुळे महायुतीला बळ
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की,माजी सभापती प्रवीण माने यांनी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात,राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची जी भूमिका स्पष्ट मांडली.
याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रवीण माने यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निर्णयाचे स्वागत करतो. सोनाई परिवार नुसते इंदापूर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक आहे. महायुतीच्या पाठीशी अजित पवारांच्या पाठीशी माने परिवाराने राहण्याचा जो निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यभर महायुतीला बळ मिळाले आहे.