लखनौ – उत्तरप्रदेशातील बसपचे माजी आमदार जितेंद्रसिंह बबलू यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, काही दिवसांतच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची वेळ भाजपवर आली.
भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा-जोशी यांनी केलेल्या तक्रारीनंतर पक्षाने बबलू यांच्याविषयीचा निर्णय घेतला. बबलू यांच्या भाजप प्रवेशाबद्दल जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी लखनौमधील माझ्या घराची जाळपोळ करण्यात आली. त्या कृत्यामध्ये बबलू सामील असल्याचा आरोप जोशी यांनी केला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बबलू यांनी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला वस्तुस्थितीबाबत अंधारात ठेवले असावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जोशी कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या घराची 2009 मध्ये जाळपोळ करण्यात आली होती. त्या कृत्यामागे बसपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप झाला.
त्यावेळी बसपच्या प्रमुख मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने बसप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यावेळी जोशी यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. त्या घटनेची आठवण जोशी यांनी करून दिल्यानंतर भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने बबलू यांना प्रवेश देण्याची चूक सुधारली.