पश्चिम महाराष्ट्र पूरसंकटात मदतीचा हात देण्याऐवजी बैठकांत गुंग
पुणे – पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र पूरसंकटात सापडला असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या सल्लामसलतीत गुंग आहेत. त्याचीच पूर्वतयारी म्हणून पुण्यात होणाऱ्या महाजनादेश यात्रेची तयारी कशी करायची यासाठी गुरुवारी बैठक झाली. त्याला झाडून सगळे उपस्थित राहिले. त्यात इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती.
पश्चिम महाराष्ट्रात पंचगंगा आणि कृष्णेच्या पुरामुळे निम्मे सांगली शहर पाण्याखाली गेले असताना तेथील पालकमंत्री सुभाष देशमुख हे देखील पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत असल्याचे दिसून आले.
पुण्याचे पालकमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी डीपी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर हाती घेण्यात आलेल्या प्रकल्प कामाचा आढावा पाटील हे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याने भाजप नगरसेवकांना उपस्थिती बंधनकारक होती.
राजकीय वर्तुळांतून टीकेचा सूर
गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भाजपचे पदाधिकारी बैठकीतच होते. परंतु, मुख्यमंत्री हे गुरुवारी सांगली आणि कोल्हापूरला भेट देणार असल्याने महसूल आणि पुनर्वसन विभागाची जबाबदारी असलेले चंद्रकांत पाटील हे सांगलीला गेले. परंतु, जाताना त्यांनी बैठकीची जबाबदारी पुणे भाजपचे प्रभारी सुभाष देशमुख यांच्याकडे सोपवली. सांगली, कोल्हापूर महापूराच्या संकटात असताना पालकमंत्री देशमुख पक्षाच्या बैठका घेत असल्याने राजकीय वर्तुळांतून टीकेचा सूर उमटला. तर काहींनी ते बुधवारी पूर्णवेळ पूरस्थितीची पाहणी करत होते, असे सांगत समर्थनही केले.