राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सारे आमदार, खासदार व मंत्री काल अयोध्येच्या दौऱ्यावर गेले आणि रामलल्लांचे दर्शन घेऊन ते सुखावले. मुख्यमंत्र्यांनी हे धार्मिक पर्यटन करण्यात खरं म्हणजे काहीच अडचण नाही. ज्यांना त्यांना आपल्या वैयक्तिक धार्मिक भावना जपण्याचा आणि त्यानुरूप आचरण करण्याचा अधिकार आहे. तथापि, असे असले तरी त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानेही बरेच राजकीय वातावरण तापले. त्यात शरद पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांनीच आपापली मते नोंदवत या दौऱ्याला अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काल वृत्तवाहिन्यांनीही शिंदेंच्या या दौऱ्याला खूप मोठी प्रसिद्धी दिली. राज्यातील इतर सर्व प्रश्नांपेक्षा त्यांना ही घटना खूप मोठी वाटली. वाहिन्यांच्या सध्याच्या या कार्यपद्धतीविषयी वेगळे काही मत व्यक्त करण्याची गरज नाही. त्यांनी आता सतत अशाच स्वरूपांच्या घटनांना अवाजवी महत्त्व देण्याची भूमिका घेतली असेल, तर त्यांना त्याविषयी काही खडेबोल सुनावण्याने त्यांच्या शैलीत काही फरक पडेल, असे संभवत नाही. मुळात या साऱ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, की या दौऱ्याचे नेमके औचित्य काय? रामनवमीची संधी साधून शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे गेले असावेत असे म्हटले तर रामनवमी होऊन गेली आहे. सध्या राज्यातील कोणत्याही इलेक्शनची अधिसूचनाही जारी झालेली नाही. बाकीचे सारे विषय मागे टाकून सर्व मंत्र्यांना तिकडे घेऊन जाण्यात मग नेमके काय हाशील होते, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांना कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
मुख्यमंत्री महोदयांनी तिकडे पत्रकार परिषद घेऊन तेथील पत्रकारांचे वेगवेगळ्या मुद्द्यांवर शंका निरसन करण्याचाही प्रयत्न केला. पण औचित्याच्या मुद्द्यावर त्यांना काही विचारण्यात आले नाही. अयोध्येत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगळी कंपने जाणवल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि समाधानाचा दिवस आहे वगैरे भाष्यही मुख्यमंत्र्यांनी तिकडे केले आहे. अयोध्येत येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी तेथे एक मोठे सदन बांधण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला असून जाता जाता आपल्या या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांचा समाचारही त्यांनी घेतला आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्या पक्षांबरोबर उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवले ती त्यांची मोठी चूक होती, ती चूक आम्ही सुधारली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवाय आपल्या गटाला शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाले हीसुद्धा त्या प्रभू रामचंद्राचीच कृपा होती, असे त्यांनी म्हटले आहे. त्याखेरीज खरे हिंदुत्व आम्हीच कायम ठेवणार आहोत, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. म्हणजे आता हिंदुत्व या मुख्य मुद्द्यावर वाटचाल करणारे चार प्रमुख पक्ष महाराष्ट्रात उभे ठाकले आहेत. भाजप हिंदुत्ववादी अजेंड्यावर काम करीत आहेच, पण उद्धव ठाकरेंच्या गटानेही हिंदुत्व सोडलेले नाही. मनसेनेही हिंदुत्वाचीच विचारधारा अंगीकारली आहे. आता शिंदे गटही त्याच मार्गाने आपली राजकीय वाटचाल करणार आहे. असे एका वेळी चार-चार राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या वाटेने निघाले असताना हिंदू किंवा हिंदुत्व धोक्यात येण्याची महाराष्ट्रातील शक्यता पूर्ण मावळली आहे, असे आपण निर्धास्त म्हणू शकतो. त्यामुळे हिंदुत्वाचे काय होणार याची चिंता करण्याची शक्यता आपण सोडून द्यायला हवी.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला आक्षेप घेणाऱ्या ज्या प्रतिक्रिया ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीकडून आल्या आहेत त्यातील प्रमुख मुद्दा असा होता, की राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असताना त्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री तिकडे का गेले. अर्थात, एक दिवसाच्या बाहेरगावच्या यात्रेने कोणी कोणाला वाऱ्यावर सोडले असे होत नाही, हे कोणाच्या लक्षातच येत नसावे. पण पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की राज्यातील महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून त्यांना अयोध्येत जावे असे का वाटले?
अर्थात, मुख्यमंत्री कधीही गेले असले तरी हा प्रश्न त्यांना विचारला जाणारच होता. त्यामुळे हा सवाल तसाही निरर्थक ठरतो. आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे, की रावण राज्य चालवणारे अयोध्येला गेले आहेत. संजय राऊत म्हणाले, की अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर तेथून पाय लावून पळणारेच अयोध्येत गेले आहेत वगैरे भाष्यांनी कालचा दिवस बराच गाजला. शरद पवार म्हणाले आहेत, की राज्यातील मुख्य प्रश्नांना बगल देत मुख्यमंत्री व विद्यमान सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहेत.
खरं म्हणजे हे रोजचेच रडगाणे झाले आहे. देशापुढील आणि जनतेपुढील मुख्य प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष धार्मिक भावना जागवणारे विषय उपस्थित करीत आहेत ही टीका तर आता रोजच्याच बातम्यांचा भाग झाली आहे. अशा प्रश्नांनी भाजपचे किंवा त्यांच्या मित्र पक्षांचेच लोक कधीच विचलित होताना दिसत नाहीत. ते त्यांच्या अजेंड्यावर ठाम असतात आणि बिनदिक्कतपणे ते आपला हा अजेंडा रेटत असतात. त्यांच्यापुढे जनतेचेच प्रश्न मांडणारे निष्प्रभ होताना दिसतात. जनतेचे विषय अजेंड्यावर घ्या असे सत्ताधाऱ्यांना कितीही कानी कपाळी ओरडून सांगितले गेले तरी रामाचा किंवा हिंदुत्वाचा विषय काढल्यानंतरच तुम्हाला हे विषय का सुचतात हे विचारायलाही सत्ताधाऱ्यांचे समर्थक मागेपुढे पहात नसतात.
हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर सामान्य माणसांच्या मनात आता एक प्रकारची उद्विग्नता येऊ लागली आहे. आपल्या प्रश्नांना कोणी वाली उरला आहे की नाही, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. एकूणच हा सारा अवघड मामला बनला आहे. पूर्वी विरोधात असताना भाजपचे लोक लोकांच्या प्रश्नावर मोठेच रान उठवायचे. आता हेच प्रश्न त्यांना अवघड ठरू लागल्याने त्यांनी हा मधला मार्ग पत्करलेला दिसत असला, तरी त्यांना मूळ प्रश्नांवर परत आणणे यातच विरोधकांचे कसब आहे.
ते हिंदुत्व आणि राम मंदिर असा विषय उपस्थित करीत राहतील, तुम्ही मात्र बेरोजगार, गैरव्यवहार आणि महागाई असे प्रश्न उपस्थित करीत राहा. शेवटी आपल्यासाठी नेमके काय महत्त्वाचे आहे, याचा निवाडा लोकच करतील. त्यामुळे येत्या वर्षभरात होणाऱ्या लोकसभेच्या आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या विवेकबुद्धीचा नेमका कस लागणार आहे, तोपर्यंत राजकीय रंगमंचावर हा सारा खेळ सुरूच राहणार आहे.