सध्या भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी त्याचवेळी उष्णतेची लाटही आली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. एप्रिल महिना सुरू होत असतानाच देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या काळामध्ये पाण्याची सर्वात जास्त गरज असते त्याच काळात खूपच कमी पाणी वापरण्यासाठी उपलब्ध असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, ही संपूर्णपणे नैसर्गिक परिस्थिती असल्याने सरकारी पातळीवर काय करता येईल याचा विचार सुरू असेलच; पण वैयक्तिक पातळीवरसुद्धा एकीकडे उष्णतेचा सामना करत असताना दुसरीकडे उपलब्ध पाण्याचा वापर पर्याप्त पद्धतीने आणि काटकसरीने कसा करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा जो इशारा दिला आहे त्याप्रमाणे एप्रिल ते जूनदरम्यान किमान 20 दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवणार आहे.
म्हणजेच या कालावधीमध्ये सर्वसामान्य माणसांना सहन होणार नाही अशा प्रकारची उष्णता निर्माण होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर जरी अनिष्ट परिणाम होत असला तरी तेवढाच मोठा नकारात्मक परिणाम तो शेती उद्योग आणि उत्पादन क्षेत्रावरही होत असतो. वाढत्या उष्णतेमुळे शेतातील पिके वाळून जाणे या घटना तर दरवर्षीच घडत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उष्णतेच्या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याने आर्थिक व्यवहारांची जी एक साखळी असते ती अनेक वेळा भंग होते. दुपारच्या वेळी गरजेचे असेल तरच घराबाहेर पडा अशा प्रकारचा आदेश आता सरकारी पातळीवरसुद्धा देण्यात आला असल्याने या कालावधीमध्ये जे आर्थिक आणि व्यापारी व्यवहार होत असतात त्यालाही फटका बसू लागला आहे.
एकीकडे उष्णतेच्या लाटेमुळे सार्वजनिक जीवन प्रभावित होण्याचा धोका असतानाच या उष्णतेवर उतारा असणार्या पाण्याबाबत सुद्धा अत्यंत गंभीर परिस्थिती समोर आली आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे भारतातील प्रमुख नद्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये तब्बल 13 नद्या संपूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अनेक मोठी धरणे असूनही या धरणांमधील पाण्याने तळ गाठला असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. बेंगळुरू, मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई ही जी मोठी शहरे उद्योग व्यवसाय आणि रोजगारासाठी आघाडीवर आहेत त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
बेंगळुरूसारख्या आयटी शहराला तर पाण्याचे रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीबाबत सर्वसामान्य नागरिक काही करू शकत नसला तरी आपले जगणे अधिक सुसह्य करण्याचे काम मात्र तो निश्चितपणे करू शकतो. साहजिकच सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे उष्णतेच्या लाटेच्या कालावधीतील नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सांभाळत असतानाच उपलब्ध पाण्याचा व्यवस्थित वापर करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये रोज सकाळी घराच्या दारात सडा घालणे किंवा वाहने धुण्याच्या कर्मकांडावर बंदी घालण्यात आली आहे. कारण, एकीकडे लोकांना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी नसताना अशा अनावश्यक कामासाठी पाणी वापरण्याचे प्रकार अनेक शहरांमध्ये अद्यापही सुरू आहेत. आता कोठे एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरोखरच पावसाला सुरुवात झाली तरच परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. पण जर पावसाचे आगमन लांबले तर आणखी किमान तीन महिने अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे वाढणारी उष्णता आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कमी होणारी पाण्याची उपलब्धता या परिस्थितीमध्ये जर जीवन अधिक सुसह्य करायचे असेल तर वैयक्तिक पातळीवर सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. सरकारी पातळीवर ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया नेहमीसारखी पूर्ण केली जाईलच; पण अशा प्रकारे जरी पाणी उपलब्ध झाले तरी त्याचा वापर योग्य प्रकारे करण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांनाच घ्यावी लागेल.
धरणे आणि इतर जलसाठ्यांमध्ये जे पाणी उपलब्ध असते त्याचा वापर सरकारला एकीकडे वैयक्तिक वापरासाठी दुसरीकडे शेतीसाठी करावा लागतो. या व्यतिरिक्त काही पाणी औद्योगिक वापरासाठीसुद्धा वळवावे लागते. या कालावधीमध्ये औद्योगिक वापराचे पाणी कमी करून ते शेतीकडे वळवण्याचा कल जरी सर्वसाधारणपणे पाळण्यात येत असला तरी समाजातील सर्वच घटकांना पाण्याची गरज आहे हे लक्षात ठेवूनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील एक शहर केवळ पाण्याअभावी आपले अस्तित्व गमावून बसल्याची बातमी नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. त्या बातमीवर चर्चा करत असतानाच बेंगळुरू, पुणे यासारख्या महानगरांमध्येसुद्धा पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. ज्या कालावधीमध्ये भरपूर पाणी उपलब्ध असते त्या कालावधीमध्ये काही विचार न करता आणि भविष्यातील परिणामांकडे दुर्लक्ष करून पाण्याचा वाटेल तसा वापर केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
आजपर्यंतचा इतिहास पाहता निसर्ग नेहमीच आपली जबाबदारी पार पाडत असतो. पावसाळी कालावधीमध्ये जेवढा पाऊस पडतो त्याचे पाणी उर्वरित कालावधीमध्ये पुरू शकते. पण जेव्हा असे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा ज्याची उधळपट्टी केली जाते आणि सर्व नियोजनच बिघडून जाते. वाढती उष्णता असो किंवा पाणीटंचाई या दोन्हीला आपणच जबाबदार आहोत. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आणि निसर्गाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झाले त्याचे परिणाम आता आपण भोगत आहोत. अर्थात, त्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल करणे आता शक्य नसले तरी या अनुभवातून शहाणे होऊनच भविष्याचा विचार करावा लागणार आहे.
कारण, यानंतरच्या कालावधीमध्ये दरवर्षीच वाढती उष्णता आणि वाढती पाणीटंचाई या दोन्ही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. राजकीय पक्षांचे नेते किंवा मोठे उद्योगपती आणि श्रीमंत धनदांडगे आपल्या पाण्याची गरज मिनरल वॉटरच्या माध्यमातून पूर्ण करत असले तरी सर्वसामान्य नागरिकाला मात्र अशी चैन परवडणारी नाही. साहजिकच यावर्षी निसर्गाने वाढती उष्णता आणि टंचाईच्या निमित्ताने जो धडा घालून दिला आहे त्यापासून सर्वजण बोध घेतील अशी आशा करावी लागेल.