सध्याच्या निवडणुकीच्या गदारोळात रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालयाने केलेली कानउघाडणी मोठाच चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली संस्थेला खोट्या किंवा लोकांची दिशाभूल करणार्या जाहिराती प्रसारित केल्याबद्दल लोकांची जाहीर माफी मागण्याची सूचना केली आहे. या प्रकरणात या आधी त्यांनी कोर्टात माफीनामा सादर केला आहे. पण न्यायालयाने तो पुरेसा मानला नाही. आपण केलेल्या चुकीची आपल्याला चांगलीच जाणीव असताना आपण फार निष्पाप असल्याचे भासवले असले तरी तुम्ही तितके निष्पाप नाही. त्यामुळे अशी माफी मागून तुम्हाला मोकळे सोडता येणार नाही, येत्या आठवडाभरात लोकांची जाहीर माफी मागा, अशी तंबी कोर्टाने त्यांना दिली आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या प्रतिष्ठेवरच आच आली आहे.
हा प्रकार इंडियन मेडिकल काउन्सिलने केलेल्या याचिकेवरून निर्माण झाला आहे. आपल्या औषधाने अनेक आजार बरे होतात अशा जाहिराती त्यांनी केल्या होत्या. त्या जाहिराती करीत असताना रामदेव बाबांनी अॅलोपथीच्या औषधांवर आणि त्यांच्या मूलभूत संशोधनावरच आक्षेप घेतला होता. त्यामुळे इंडियन मेडिकल काउन्सिल भडकली आणि त्यांनी बाबांना कोर्टात खेचले. त्यामुळे आता रामदेव बाबांना गुढघे टेकायची वेळ आली आहे. दिशाभूल करणार्या जाहिराती या अनावधानाने दिल्या जाऊ शकत नाहीत. त्या प्रसिद्ध करताना आपलेच संशोधन जगात सगळ्यात भारी असल्याचा पतंजली संस्थेचा जो अविर्भाव होता, तो जागेवर आणण्याची गरजच होती. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्हच मानला पाहिजे. रामदेव बाबांची सारी भिस्त प्राचीन आयुर्वेद शास्त्रावर आधारित आहे.
त्यातून त्यांनी त्यांच्या परीने संशोधन करून अगदी करोनासारख्या रोगावरसुद्धा रामबाण उपाय आम्ही शोधल्याचा दावा करीत कोरोनिल नावाचे औषध करोना काळात बाजारात आणले होते. हे सारे त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या किंवा अभ्यासाच्या आधारावर केले असेलही; पण असे करताना सध्याची अॅलोपथीची जी औषध पद्धती आहे, त्यावर त्यांनी नाहक टीका केली. अॅलोपथी उपचार पद्धतीच अशास्त्रीय ठरवण्याचा प्रकारही त्यांनी केला होता. तो त्यांनी टाळायला हवा होता. यातून लोकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत असल्याचे लक्षात आल्याने इंडियन मेडिकल काउन्सिलने पुढाकार घेऊन न्यायालयीन लढा दिला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदनच करायला हवे. वास्तविक रामदेव बाबांचे योग आणि आयुर्वेदाच्या प्रचाराचे योगदान मोठे आहे. त्यांनी योग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या या कार्याची आज कोर्टानेही दखल घेतली; परंतु अवास्तव मजकुरांच्या जाहिरातींवर मात्र कोर्टाने त्यांच्यावर चांगलेच कोरडे ओढले आहेत.
अर्थात कोर्टाने त्यांच्या योग किंवा आयुर्वेदाच्या प्रसारावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही किंवा रामदेव बाबांची जी अन्य ग्राहकोपयोगी उत्पादने आहेत त्यांच्यावरही आक्षेप घेतलेला नाही. कोर्टाचा आक्षेप केवळ अवास्तव दावा करणार्या औषधी उत्पादनावर आहे. हा विषय प्रसारमाध्यमांतून लोकांपुढे येत असताना हा मुद्दाही लोकांच्या प्रकर्षाने लक्षात आणून देण्याची गरज आहे. रामदेव बाबांनी आपल्या ग्राहकोपयोगी उत्पादनांद्वारे मोठे साम्राज्य उभारले आहे. त्यात साबणापासून तुपापर्यंतची अनेक उत्पादने आहेत. ही उत्पादने शुद्ध स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला इरादा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजारात मिळणार्या अशा अनेक वस्तू बनावट किंवा आरोग्याला हानिकारक असल्याने आपलीच उत्पादने शंभर टक्के शुद्ध व आरोग्यदायी असल्याचा त्यांचा दावा असतो.
त्यावर देशातील लक्षावधी लोकांनी विश्वास ठेवून त्यांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यातून रामदेव बाबांचे हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे राहिले आहेे. त्यातून रामदेव बाबांनी भारतीय बाजारपेठेत एक मोठाच झंझावात निर्माण केला आहे. त्यामुळे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यांचा हा सुसाट वेगाने निघालेला वारू कसा रोखायचा हा सगळ्यांपुढेच प्रश्न होता. पण इंडियन मेडिकल काउन्सिलने त्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मोठा लगाम लावला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मुद्दा लोकांपुढे निर्माण होतो की, रामदेव बाबांच्या जाहिरातबाजीला लगाम घातला गेला असला तरी बाजारात आज विविध उत्पादनांच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात त्यालाही लगाम घालण्याची गरज आहे. त्यातील अवास्तव दावे कितपत खरे असतात त्याची वैज्ञानिक कसोटी काही आहे की नाही असाही प्रश्न उपस्थित होतो.
या उत्पादनांमध्ये सौंदर्यप्रसाधनाची उत्पादने बाजारात आणणार्या कंपन्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्या जाहिरातींचे प्रमाणही अधिक आहे. महिनाभरात गोरेपणा मिळवा किंवा अगदी काही आठवड्यात गेलेले केस पुन्हा परत मिळवा अशा जाहिराती रोजच पाहायला मिळतात. डायबेटीससारखा आजार झालेल्या लोकांची देशातील संख्या मोठी आहे, या लोकांना गिर्हाईक बनवण्यासाठी या रोगावर हमखास रामबाण उपाय ठरण्याचा दावा करणार्या औषधी उत्पादनांच्याही जाहिराती मोठा प्रमाणावर प्रसारित होत असतात. धास्तावलेले रुग्ण रोज नवनवीन औषधांच्या जाहिरातींना बळी पडत असतात. अशा प्रकारावरही आता इंडियन मेडिकल काउन्सिलने पुढाकार घेऊन त्यांनाही योग्य मार्गावर आणण्याची गरज आहे. आता एवीतेवी हे काउन्सिल रामदेव बाबांच्या विरोधात पुढे सरसावले आहेच, तर त्यांनी अन्यही अवास्तव दावे करणार्या औषधांच्या बाबतीतही हाच पुढाकार कायम ठेवण्याची गरज आहे.
रामदेव बाबांनी आपली चूक दिलखुलासपणे मान्य करून माफी मागितली आहे. आता ते कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर माफीही मागतील; पण या प्रकाराने त्यांनी खचून न जाता योग आणि आयुर्वेदाच्या प्रसाराच्या बाबतीत आपले कार्य नेमस्तपणे चालूच ठेवले पाहिजे. हा प्राचीन उपचार पद्धतीचा ठेवा त्यांनी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला आहे. त्यांचे हे मिशन असेच कायम राहण्याची गरज आहे. पण त्याच वेळी त्यांनी आपल्या उपक्रमांना मिळणार्या प्रतिसादाने वाहत जाऊन अवास्तव किंवा लोकांची दिशाभूल होईल अशी जाहिरातबाजी करणे टाळले पाहिजे हाच या निमित्ताने त्यांना मिळालेला धडा आहे.