महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. ज्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या दबावला बळी न पडण्याची सूचना केली आहे. आपण सर्वांनी उठाव केल्यामुळेच भाजपाला सत्तेत सहभागी होता आले याची जाणीव शिवसेनेने भाजपाला करून द्यावी, अशा प्रकारचा विचारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची संयुक्त सत्ता असल्याने आणि लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये तीनही पक्ष आघाडी म्हणून एकत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आघाडी धर्माची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. पण एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह भारतात सर्वत्र आघाडीधर्माची ऐशीतैशी होताना दिसत आहे.
कोणत्या ना कोणत्या कारणाने विशेषतः सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये मात्र आपला आघाडीधर्म विसरतात. याची अनेक उदाहरणे विद्यमान काळामध्ये समोर येत आहेत. विशेषतः महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या विविध घटना घडल्या आणि नवीन घरोबे तयार झाले त्या पार्श्वभूमीवर हा आघाडीधर्म जास्तच उठून दिसत आहे. केंद्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर जेव्हा कोणत्या एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवणे शक्य होत नाही तेव्हा मित्र पक्षांची जमवाजमव करून आघाडीचे राजकारण केले जाते. सत्तेत सहभागी होत असताना सर्वांनाच बरे वाटत असले, तरी ऐन निवडणुकीच्या कालावधीत मात्र या आघाडीधर्माची कसोटी पाहिली जाते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये तीच कसोटी अतिशय उच्च पातळीवर पाहिली जात आहे.
अर्थात, केवळ सत्तेवर असलेल्या आघाडीमध्ये आघाडीधर्माची आव्हाने निर्माण झाली आहेत असे नाही, तर विरोधी बाकावर बसलेल्या आघाड्यांमध्येसुद्धा अशाच प्रकारचे अंतर्विरोध दिसत आहेत. उदाहरणार्थ, ज्या प्रकारे सांगली लोकसभा मतदारसंघावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे तेही लक्षणीय मानावे लागेल. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काहीच दिवसांनी पूर्ण होत असताना अद्यापही सत्ताधारी महायुती असो किंवा विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी असो त्यांच्या सर्व उमेदवारांच्या नावांची निश्चिती झालेली नाही. सर्वसाधारणपणे जेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने असे विविध पक्ष एकत्र येतात तेव्हा संयुक्तपणे जागावाटप केले जाते आणि त्या त्या ठिकाणी उमेदवार निश्चिती केली जाते आणि सर्व आघाडी पक्षांचे नेते संयुक्तपणे त्याची घोषणा करतात.
पण यावेळी प्रथमच असे घडले आहे की प्रत्येक आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे आपल्या जागांची घोषणा करत आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगली मतदार संघातून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. प्रत्यक्षात हा मतदारसंघ काँग्रेससाठी राखीव आहे. काँग्रेसचा हा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो. साहजिकच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा न करता विशेषतः काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर वादविवाद निर्माण होणे साहजिकच होते आणि त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत. ज्या प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत करण्याचे संकेत दिले आहेत ते पाहता या मतदार संघापुरती तरी आघाडीधर्माची कसोटी अतिशय तीव्र पातळीवर पाहिली जाणार आहे, असेच दिसते.
दुसरीकडे भाजपानेसुद्धा अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदे गट असो त्यांच्या जागा कमी करून कमळाच्या चिन्हावर जास्तीत जास्त जागा लढवल्या जाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत 400 हा आकडा पार करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने समोर ठेवले असल्याने जास्तीत जास्त जागा कमळ या चिन्हावर निवडून याव्यात हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. पण हा आग्रह असताना सहकारी मित्र पक्षांवर मात्र अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तयार होत आहे याकडे मात्र भाजपचे दुर्लक्ष होत आहे. याच भावनेतून शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट भाजपाच्या दबावाला बळी पडू नका, अशी मागणी केली आहे. अनेक वेळा भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यासारख्या राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या राष्ट्रीय पातळीवर जे धोरण ठरेल त्याचाच अवलंब करावा लागतो आणि हे धोरण अमलात आणत असताना राज्यपातळीवरील अनेक विषयांमध्ये तडजोड करावी लागते.
भाजप किंवा काँग्रेस यांच्याबाबत सध्या तीच अडचण निर्माण झाल्यामुळे आघाडीधर्माचे पालन करण्यातही आव्हाने निर्माण होऊ लागली आहेत. गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेले दोन गट एक सत्ताधारी पक्षाकडे आणि एक विरोधी पक्षाकडे गेल्यामुळे जागावाटपाचे वाटेकरीही वाढले आहेत. सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी एखादा विद्यमान खासदार आहे त्या ठिकाणी त्या खासदाराच्या पक्षालाच तिकीट मिळणे गृहित धरले जाते. पण यावेळी अनेक विद्यमान खासदारांची तिकिटेही कापण्यात आली असल्याने हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अर्थात, निवडणुकीचा टप्पा येण्यापूर्वीच सर्वच आघाड्यांना आपल्या उमेदवारांची निश्चिती करावी लागणार आहे.
पण त्यानंतर प्रचाराची यंत्रणाही उभारावी लागणार आहे. त्या प्रचारामध्ये मात्र सर्वच पक्ष आपापल्या आघाडी धर्माचे पालन करतील आणि आघाडीच्या उमेदवारालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा करावी लागेल. एकूणच विद्यमान निवडणुकीच्या राजकारणामध्ये आघाडीधर्माची ऐशीतैशी झाली असली तरी सर्वच राजकीय पक्षांना त्यातून मार्ग काढूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.