नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना आता झेड श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्र्यांना वाय श्रेणीचे सुरक्षा कवच मिळायचे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस ही जबाबदारी सांभाळत होते. 68 वर्षीय जयशंकर यांना दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र पथकाने ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षा घेरामध्ये संरक्षण दिले होते.
सीआरपीएफकडून त्यांना आता मोठ्या ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचाखाली सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये देशभरात सुमारे 14-15 सशस्त्र कमांडो 24 तास शिफ्टमध्ये त्यांच्यासोबत असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह सीआरपीएफकडे सध्या 176 लोक व्हीआयपी सुरक्षा कवचाखाली आहेत.