मुंबई – बृहन्मुंबई पोलिसांच्या आस्थापनेवर 3 हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर गृहमंत्र्यांना पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर हवेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार 3 हजार “बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक) नेमणार आहे. मग गृहमंत्र्यांचा आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे. त्यांनी या उपहासात्मक ट्विटमध्ये फडणवीसांना टॅग केले आहे.
यासह, हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे, तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलिस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरुण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय?, असे कळीचे प्रश्न उपस्थित करत सुळे यांनी गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे.