अकोले -अकोले तालुक्यातील गणोरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह झाला. अशा पद्धतीने नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच विवाह करण्याचा इतिहास करोनाच्या प्रभावामुळे घडला.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गणोरे येथे प्रथमच अतिशय साध्या पद्धतीने ग्रामपंचायत तथा विवाह नोंदणी कार्यालयात विवाह झाला. गणोरे येथील जयवंत दातीर यांच्या कन्येचा हा विवाह होता. चिंचोली गुरव येथील सोनवणे परिवाराची ती सूनबाई झाली. हा विवाह गणोरे ग्रामपंचायत कार्यालयात झाला. यावेळी नोंदणी अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांनी लगेच नवदाम्पत्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले.
ढाकणे म्हणाले की, माझ्या गेल्या 34 वर्षीच्या नोकरी दरम्यान इतका साधा आणि ग्रामपंचायत कार्यालयात विवाह प्रथमच होत आहे. अशा प्रकारचा विवाह हा नगर जिल्ह्यात प्रथमच झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. एकीकडे डोळे दिपवून टाकणारे विवाह होत असताना असे विवाह होणे ही काळाची गरज आहे. दोन्ही कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अशा पद्धतीने विवाह होणे गरजेचे आहे. बचतीचे पैसे वधू वरांना भविष्याच्या दृष्टीने उपयोगी ठरतील असे मत पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंबरे यांनी व्यक्त केले. गणोरे गावापासून सुरु झालेल्या या नव्या प्रथेचे संपूर्ण महाराष्ट्र भर पायंडा पडावा अशा शुभेच्छा गणोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना दातीर, उपसरपंच राजेंद्र आंबरे, ज्येष्ठ नेते अशोक आहेर, अंबादास दातीर, गोरख आहेर, अविनाश आहेर, जगनाथ आहेर आदींनी दिल्या.