मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्यातही मुंबईतील बाधितांची संख्या जास्त आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग सात वरून १३ दिवसांवर आला आहे. उपचारांची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला २४ तासांत खाट उपलब्ध होण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाच हजार खाटा आणि खासगी रुग्णालयांसह मोठ्या मैदानांमध्ये दहा हजार खाटा उभारण्याचे पालिके च्या विशेष कृती दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईचा रुग्णसंख्या दुपटीचा वेग एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सात दिवसांचा होता. हळूहळू तो दहा दिवसांवर आला. मे अखेपर्यंत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत जाईल असे संकेत देण्यात आले होते. १ मे रोजी शहरात ७६२५ रुग्ण होते, तर १३ मे रोजी रुग्णसंख्या १५,५८१ वर पोहचली होती. रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला असून सात दिवसांवरून १३ दिवसांवर आल्याचे पालिके त विशेष नियुक्ती के लेल्या मनीषा म्हैसकर यांनी म्हटले आहे.
टाळेबंदी, रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा तातडीने शोध आणि निदान यामुळे रुग्णवाढीचा वेग कमी करणे शक्य झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नायर रुग्णालयाने कमी वेळेत ७५० खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी सुरू करून आव्हान पेलले आहे. यात ११० खाटा करोनाबाधित माता, ५० डायलिसीसवरील रुग्ण, ५३ अतिदक्षता विभागात उपलब्ध असून ९६ खाटा संशयित आणि लक्षणे असलेल्या करोनाबाधित रुग्णांसाठी आहेत.
मे अखेर खाटांची क्षमता एक हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. नायरमध्ये चाळीसहून अधिक मातांची प्रसूती झाली असून यातील एकाही बाळाला संसर्ग झालेला नाही, याचा विशेष उल्लेख मैसकर यांनी केला आहे. केईएम रुग्णालयानेही कमी वेळेत येथे ३७९ खाटा उपलब्ध केल्या आहेत.
उपचाराची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला खाट उपलब्ध होण्यासाठी खाटांची क्षमता वाढविण्यावर पालिकेचा सध्या भर आहे. १५ एप्रिलपर्यत शासकीय रुग्णालयांमध्ये १६०० खाटा उपलब्ध होत्या. १ मेपर्यत खाटांची संख्या २९०० पर्यत वाढविली. १५ मे पर्यत ही संख्या ३५४० वर पोहचली आहे.