बेळगाव – कर्ऩाटकातील बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या महापालिकांच्या निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 23 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
भारतीय जनता पक्षाने बेळगावातील निवडणूक पहिल्यांदाच थेट पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे गहाळ कारभार असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून याबाबतच निर्णय घेण्यात येईल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत जाऊन नशीब अजमावण्याचे ठरवले आहे. बेळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून भाषक प्रश्नांवरच स्थानिक निवडणुका झाल्या असून एकीकरण समितीशी संबंधित उमेदवार आणि महापौर निवडून आलेले आहेत.
भाजपचे राज्यसभा सदस्य एरन्ना काडदी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या पक्षाला विजयाची संधी असल्याने पक्षाकडे शेकडो इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केले आहेत. शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे राजकारण नियंत्रणाच्या बाहेर गेले असून त्यांच्या खोड्या वाढल्या आहेत त्यामुळे आमच्या पक्षाने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
बेळगांव लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी सांगितले आहे की, शिवसेना आणि एकीकरण समिती एकत्रितपणे लढणार आहे.
बेळगांवबरोबरच कलबुर्गी आणि हुबळी-धारवाड महापालिका जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. कलबुर्गीतील जनता दलाचे (सेक्युलर) अतिशय प्रभावी नेते अप्पू गौडा यांना भाजपने पक्षात ओढले आहे.