विनय खरे
औषधी वनस्पती लागवड पारंपरिक शेतीला पर्याय ठरू शकतो, शिवाय निर्यातीतून परकीय चलन मिळू शकते.
भारत देशाची सांस्कृतिक-भौगोलिक विविधता जशी आहे तीच आपल्याला औषधी वनस्पतींच्या बाबतीतही पाहायला मिळते. समृद्ध आयुर्वेद वारसा, जंगलातून मिळणारी प्रभावी जडी बुटी, गेल्या काही काळात त्यावर संशोधन होऊन त्याला मिळालेली आधुनिकतेची जोड, याने हर्बल औषधी उपयोगात आणण्याकडे कल वाढत आहे. तशातच भारतीय आयुर्वेदाची ओळख जगभर निर्माण झाल्याने औषधी वनस्पतीला मागणी सातत्याने वाढत आहे. त्या मानकानुसार याची लागवड केल्यास निर्यातीला चांगला वाव आहेच शिवाय देशी बाजारपेठेतील मागणी पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
याचा थेट संबंध आदिवासी समाजाशी असल्याने याद्वारे त्यांनाही आर्थिक फायदा मिळेल. या वनस्पतींची समूह लागवड केल्यास अधिकचा फायदा देण्यास काही कंपन्या सरसावल्या आहेत. परिपूर्ण माहितीच्या आधारे औषधी वनस्पती लागवड केल्यास परिणामी नफ्यात मोठी वाढ होऊ शकते. काळानुसार यात सरमिसळ होऊ लागली. मात्र, संशोधनानुसार याची शेती पद्धतीने लागवड झाल्यास शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. पॅरिस बाजारात सुगंधी द्रव्यांना मोठी मागणी आहे, अनेक भारतीय कंपन्यांनी तिकडे आपली सुगंधी द्रव्य उपलब्ध केली आहेत. मुंबईतील अनेक कंपन्या या व्यापारात आहेत.
देशभरात आयुर्वेदिक प्रसाधनांचा वापर वाढत आहे. त्यात अनेक नामांकित कंपन्या असल्याने त्याही प्रोत्साहन देत आहेत. विविध कृषी विद्यापीठांत औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन नि उपयोग यांचा स्वतंत्र विभाग सुरू झाला आहे. आयुर्वेदातील औषधी आणि सुगंधी वनस्पतीवरील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
केंद्रीय स्तरावर आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ गेली काही वर्षे कार्यरत आहे. औषधी वनस्पती लागवड, संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापन ही सूत्री घेऊन योजना राबवत आहे. भविष्यकाळात यासाठी मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी तशी झेप घेऊ शकतात. अपेक्षित वेळेत उत्पादन घेता आल्यास चांगल्या नफ्याबरोबरच स्वतःच्या तसेच शेती धंद्याचा विकास शक्य होईल. मात्र, त्यासाठी लागवड तंत्र आत्मसात करावे लागेल नि परिपूर्ण माहिती घेण्याची गरज आहे.
आपल्या देशात सह्याद्री, विंध्य, हिमालय आदी पर्वतीय भागात असणाऱ्या दुर्मिळ औषधी वनस्पतीचा योग्य अभ्यास झालेला दिसून येत नाही. सध्या आयुर्वेदावरील जुन्या पुस्तकांचा आधार घेऊन औषधी वनस्पतीवरील माहिती उपलब्ध करून दिली जाते. लोकांच्या वास्तविक जीवनाशी संबंध येत नसल्याने प्रत्यक्षातील समस्यांचा ऊहापोह केला जात नाही. अशा अपुऱ्या आणि समस्यांशी संबंधित नसलेल्या माहितीने शेतकरी गोंधळून जातात.
आंतरराष्ट्रीय बाजारात अतिमहत्त्वाच्या 50 औषधी वनस्पतींचा व्यापार होतो. त्यांच्या किमती हॅमबर्ग, न्यूयॉर्क, ओसाका इथे ठरतात. ही बाब आपल्याकडील औषधी नि सुगंधी वनस्पती निर्मात्यांना कितपत ठाऊक असेल हा महत्त्वाचा प्रश्न. वास्तविक जागतिक बाजारपेठेतील घडामोडींची इत्यंभूत माहिती अनेकांना नसते. शासकीय नि खासगी स्तरावर अशी माहिती देण्याचा प्रयत्नही होत नाही.
जागतिक बाजारपेठेत औषधी वनस्पती व्यापार हजारो कोटी रुपयांच्या जवळ आहे. त्यात भारताचा वाटा मुबलक ज्ञान भांडार नि वैविध्यपूर्ण वनस्पती असूनही मर्यादितच आहे. हजारो वर्षांपासून अभ्यास केलेल्या 45 हजार औषधी वनस्पती भारतात उपलब्ध आहेत. तथापि, प्रत्यक्षात मात्र साडेनऊ हजार वनस्पतींचाच उपयोग केला जातो अशी माहिती मिळते.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने राज्यात छोट्या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी औषधी वनस्पती शेतीस उत्तेजन देण्यासाठी मोठी तयारी केली आहे. बुंदेलखंडमधील पथदर्शी प्रकल्पानंतर
पूर्वेतील शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून अन्य जिल्ह्यांत औषधी वनस्पती शेतीस उत्तेजन देण्याचे प्रयत्न होत आहेत. गोरखपूरमधील शेतकरी मोठ्या संख्येने तुळस, अश्वगंधा, शतावरी, काळमेघ, ब्राह्मी, सर्पगंधा, अलोव्हेरा अशा रोपट्यांच्या रोपवाटिका तयार करत आहे अशी माहिती मिळते.
आठवडाभरापूर्वी वांद्य्रातील बीकेसी येथे मियावाकी वनाची सुरुवात मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यात फळझाडे, फुलझाडे यासह औषधी गुणधर्म असणाऱ्या झाडांचा समावेश आहे. कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी “मियावाकी’ ही संकल्पना कोकणातील “देवराई’ नि सिंगापूरमधील “अर्बन फॉरेस्ट’शी नाते सांगणारी आहे. अशी अधिकाधिक वने मुंबईत विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या वनस्पती लागवडीविषयी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेणे गरजेचे आहेच. शिवाय उत्पन्न वाढीसाठी, परकीय बाजारात कोणत्या वनस्पतीला चांगला भाव मिळतो, आपली जमीन, हवामान याची माहिती शेतकरी वर्गानेही घ्यावी.