राजगुरूनगर – खेड तालुक्यातील सुरकुंडी-चिखलगाव रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूकडून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. रस्ता अरुंद असल्याने याभागात एसटी बससेवा नसल्याने पर्यायी रस्ता म्हणून शिरगाव-मोरोशी डेहणे या मार्गाचा नागरिकांना अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे 10 रुपयांच्या प्रवासासाठी त्यांना 50 ते 60 रुपये खर्च करावे लागत आहेत, त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी चिखलगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शासनाचे नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
या रस्त्याची दुरुस्ती व रस्ता रुंदीकरण करण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून शासन दरबारी या परिसरातील गावातील नागरिक पाठपुरावा करीत आहेत; मात्र त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शिवाय एखादी व्यक्ती आजारी झाली अन् तिला अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी जवळचा मार्ग अधूनमधून बंद होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
खेड तालुक्यातील चास कमान धरणामुळे विस्थपित झालेल्या माझगाव, सुरकुंडी, गोरेगाव या परिसरातील 40 गावांना पूर्वी रस्ता नसल्याने मोठे हाल होत होते. दरम्यान, या भागाला जोडण्यासाठी धारणांतर्गत वाळद सुरकुंडी येथे भीमानदीवर चास कमान धरणाच्या जलाशयावर पायलट पूल बांधण्यात आला आहे. यामुळे या भागातील सुमारे 40 गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय हेत आहे.
वाळद गावातील या पायलट पुलापुढे रस्त्याचे काम अरुंद झाले आहे. नागमोडी वळणे असलेल्या या रस्त्यावर एकावेळी दोन वाहने पास होत नसल्याने मोठ्या समस्यांना नागरिकांना आणि वाहन चालकांना तोड द्यावे लागत आहे. गावांसाठी पर्यायी मार्ग नसल्याने या अरुंद वळणावर वाहने अडकल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
40 गावांना जोडणारा पायलट पूल आणि रस्ता झाला. यामुळे गेली 30 वर्षांचा प्रश्न मार्गी लागला मात्र पुलापुढे चिखलगाव बाजूकडे अरुंद रस्ता व त्यावरील वळणे वाहतुकीला अढथळा बनली आहेत. त्यामुळे जवळचा मार्ग असताना दूरच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड तर बसतोच शिवाय सर्वाचा वेळ वाया जात आहे. या वळण रस्त्यावर रुंदीकरण करून एसटी बससेवा तात्काळ सुरु करावी अन्यथा या परिसरातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील.
– बाळासाहेब गोपाळे, माजी सरपंच, सुरकुंडी