गांधीनगर – गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एका काॅंग्रेस पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी तब्बल तीन हजार लोक सहभागी झाले होते. उपस्थितांनी लग्नानंतर भोजन केले. मेजवानी खाल्ल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
मेहसाणाचे एसपी पार्थराज सिंह गोहिल यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा विसनगर तालुक्यातील सावला गावात घडली. सावळा गावात स्थानिक काँग्रेस नेत्याच्या मुलाचे लग्न होते. त्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या शेकडो लोकांना बोलावले होते.
शुक्रवारी रात्री नेताजींच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला सुमारे 3 हजार लोक उपस्थित होते. मेजवानी खाल्ल्यानंतर लोकांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आजारी पडल्याने समारंभात गोंधळ उडाला. यानंतर पीडितांना विसनगर, मेहसाणा आणि वडनगर येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनीही रूग्णांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रूग्णालयात धाव घेतली.
एसपींनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अन्न विभागाने लग्न समारंभात दिल्या जाणाऱ्या जेवणाचे नमुने गोळा केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. समारंभात मांसाहार खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार लोकांनी केल्याचे समजते. लग्नासाठी जेवण बनवण्याची ऑर्डर दिल्ली दरबार नावाच्या केटरर्सला देण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सध्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक अचानक आजारी पडण्याचे फूड पॉयझनिंगचे कारण काय होते, हे तेथून अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतरच याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.